भेंडा – करोना रुग्णांचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत असले, तरी घाबरण्याचे कारण नाही. पण सावधगिरी बाळगणे तितकेच महत्त्वाचे आहे. वेळीच उपचार घेतलेले रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. काही अडचण वाटल्यास लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाशी त्वरीत संपर्क करा, असे आवाहन कारखाना सदस्य तथा पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले पाटील यांनी केले.
भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना कर्मचारी वसाहतीत आज राज्य शासनाने हाती घेतलेल्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. कारखाना कामगार वसाहतीतील अधिकारी, कर्मचारी व कामगारांच्या कुटुबियांची करोनाच्या पार्श्वभूमीवर घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी डॉ. घुले बोलत होते. ते म्हणाले, कारखाना कामधेनूत कर्मचारी वर्ग हा मुख्य घटक असल्याने त्यांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांनी करोनास घाबरण्याचे कारण नाही. उलट घाबरल्याने इतर आजार पुढे येतील. त्यामुळे वेळीच सावधान होत उपचार करणे हेच हिताचे ठरेल. रॅपिड अँटिजन टेस्ट भेंडे केंद्रात सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, कुकाणे केंद्राचे वैद्यकीय अधिकारी रामेश्वर शिंदे, कारखाना संचालक अशोकराव मिसाळ, राष्ट्रवादीचे गणेश गव्हाणे, भेंडे समुदाय केंद्राच्या डॉ. पूजा लोखंडे, डॉ. सृष्टी हिवाळे, जिजामाता नर्सिंग स्कूलचे प्राचार्य गणेश शिनगारे, कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी कल्याणराव म्हस्के, बाळासाहेब आरगडे, पंजाब शिंदे, कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे, सुरक्षाधिकारी सुनील देशमुख, आरोग्य सहायक अशोक गर्जे, श्याम देऊळगावकर, आरोग्यसेविका सुरेखा खंडागळे, छाया शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.