डोंबिवली – रिक्षामधून बाहेर काढून प्रवाशाचा गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीच्या ठाकुर्ली परिसरात घडली. बेचनप्रसाद चौहान (सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) असे मृत्यू पावलेल्याचे नाव आहे.
चोरीच्या हेतून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रिक्षात दोन प्रवाशी होते. एका प्रवाशाची हत्या करण्यात आली असून बचावलेल्या प्रवाशाने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.
डोंबिवलीतील शेलारनाका परिसरात राहणारे बेचनप्रसाद चौहान आणि बबलू चव्हाण हे फर्निचर चे काम करतात. हे दोघेही उत्तरप्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील राहणारे असून ते रात्री गावाकडे जाण्यासाठी रिक्षातून कल्याण स्टेशनकडे निघाले होते. यावेळी रिक्षा खंबाळपाडा परिसरात पोहोचताच काही लोकांनी रिक्षा थांबवली.
दोघांनाही रिक्षाबाहेर काढण्यात आले. त्यांना मारहाण करण्यात आली. यात एकाचा गळा कापला. तर दुसरा जखमी अवस्थेत झाडी झुडपात पडला. तोही मृत्यू पावल्याचे समजून चोरटे त्यांच्याजवळील रोकड घेऊन पसार झाले. बचावलेल्या बबलू चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस पुढील तपास करत आहेत.