कुडाळ – जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाल्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले जाऊ लागले असून जावळी तालुक्यातून सोसायटी मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे आमदार शशिकांत शिंदे यांना बॅंकेत जाण्यापासून रोखण्यासाठी जावळी तालुक्यातील राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. यावेळी जावळीतून जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे यांचे पती ज्ञानदेव रांजणे यांनी चांगलेच दंड थोपटले असून ही बॅंक निवडणूक तालुक्यातून बिनविरोध होणे कठीण वाटत आहे, अशी राजकीय परिस्थिती आहे.
जावळी तालुक्यात एकूण 49 विकास सेवा सोसायटी आहेत. जिल्हा बॅंकेत आतापर्यंत सोसायटी मतदारसंघातून तालुक्यातून माजी आमदार कै. लालसिंगराव शिंदे, भिकू धनावडे, कै. राजेंद्र शिंदे,सुनेत्रा शिंदे यांनी प्रतिनिधित्व केले. तर गत दोन टर्म आमदार शशिकांत शिंदे प्रतिनिधित्व करीत आहेत. यावेळी बॅंक निवडणुकीत विधानसभा निवडणुकीचे पडसाद उमटलेले पाहयला मिळत आहेत. कोरेगावमधून पराभव झाल्यामुळे शशिकांत शिंदे यांनी आपले लक्ष जावळी तालुक्यावर ठेवले आहे.
त्यामुळेच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार शशिकांत शिंदे यांच्यात मनभेद निर्माण झाल्याचे चित्र आहे. अशातच आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे ज्ञानदेव रांजणे यांनी ठराव घेण्यापासून कमालीची तयार केलेली पाहता आमदार शशिकांत शिंदे यांना ही निवडणूक म्हणावी तितकी सोपी जाईल असे वाटत नाही.
दोन्ही बाजुंनी तालुक्यातील सोसायटी ठराव आपल्याच बाजूंनी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ही निवडणूक रंगतदार होणार यात शंका नाही. रांजणे यांनी सोसायटी मतदारांच्या गाठीभेटींवर जोर दिला आहे.
तर आमदार शिंदेदेखील जावळीत तळ ठोकून आहेत. रांजणे यांना पडद्यामागून खरी ताकद कोणाची मिळत आहे, हे तालुक्यातील राजकीय जाणकारांना चांगलेच माहिती असल्यामुळे सोसायटी मतदार देखील चांगलेच भांबावून गेले आहेत. अशात बहुतांश सोसायट्या या कुडाळ, सायगाव भागात असल्यामुळे मतदारांची यावेळी मोठी कसोटी लागणार आहे. तर या निवडणुकीत आमदार शिंदे विरुद्ध ज्ञानदेव रांजणे असा सामना रंगलाच तर मतदारांना उमेदवार निवडून देण्याची चांगली संधी आहे. त्यासाठी त्यांचा कस लागणार आहे.
कुडाळचे शिंदे आणि मानकुमरेंसमोर पेच
तालुक्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणून वसंतराव मानकुमरे यांना ओळखले जाते. मात्र, ते ज्या जावळी सहकारी बॅंकेचे नेतृत्व करतात, त्या बॅंकेची निवडणूक देखील तोंडावर आली आहे.जावळी बॅंक ताब्यात ठेवण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांची मोठी मदत त्यांना होते. तर त्याचे पूर्ण राजकारण जिल्हा परिषद निवडणुकीवर अवलंबून असल्यामुळे तीही निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्यामुळे मानकुमरे बुचकळ्यात पडलेले पाहयला मिळतात.
निवडणूक बिनविरोध झालीच नाही तर त्यांची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशीच होणार आहे. तशीच काहीसी परिस्थिती कुडाळच्या शिंदेंचीही होईल. तालुक्यातील प्रमुख सहकारी संस्था त्यांच्या ताब्यात आहेत त्या आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी त्यांना दोन्ही आमदारांची गरज भासणार असल्यामुळे कुडाळचे शिंदेसमोर देखील मोठा राजकीय पेच निर्माण होईल.