सातारा – भाजपने सत्तेसाठी पक्ष, घरे फोडली. यंत्रणांचा गैरवापर करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या हुकूमशाही कारभारामुळे भाजपबद्दल जनतेत असंतोष आहे, असे आ. शशिकात शिंदे यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यातील प्रश्न पोटतिडकीने सोडवले असून जनतेच्या प्रश्नांसाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनता महाविकास आघाडीच्या मागे राहून क्रांती घडवेल, असा विश्वास आ. शिंदे यांनी व्यक्त केला.
महाविकास आघाडीच्यावतीने विसापूर (ता. खटाव) येथे आयोजित प्रचार सभेत आ. शिंदे बोलत होते. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा बॅंकेचे संचालक प्रदीप विधाते, भानुदास कोरडे, मानाजी घाडगे, सागरभाऊ साळुंखे, जोतीनाना सावंत, बाळासाहेब इंगळे, सुनीलशेठ जाधव, राजेंद्र कचरे, राजेंद्र घाटगे, वसंतराव जाधव, संजय चव्हाण, प्रदीप जाधव, महेश नलवडे, अर्जुन मोहिते, डॉ. महेश पवार, प्रदीप गोडसे, संजय नलवडे, बाळासाहेब जाधव, विनायक काळे, उदय कदम, ज्ञानेश्वर जगताप, संतोष जगदाळे, महादेव लोंढे आदी उपस्थित होते. आ. शिंदे म्हणाले, देशात दहा वर्षात महागाईचा आगडोंब झाला. बेकारीची मोठी समस्या निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याऐवजी त्यांना नाहक त्रास देण्याचे प्रकार घडले. भाजपने आश्वासने पाळली नाहीत. त्यामुळे जनतेचा भाजपबद्दल प्रचंड रोष आहे. देशवासियांच्या प्रश्नांना बगल देत भाजपने व्यक्तीद्वेषातून आणि सुडबुध्दीने विरोधी पक्ष संपवण्याचे काम केले आहे.
जिल्ह्यात नेहमीच विकासाला प्राधान्य दिले. कधीही धाकधपटशाहीचे राजकारण केले नाही. आम्हाला मतदान दिले नाही तर पाणी देणार नाही अशी वल्गना काही जण आज करत आहेत. अशा धमकी देणाऱ्यांना जागा दाखवण्याची गरज आहे. यावेळी डॉ. सुरेश जाधव, प्रदीप विधाते, भानुदास कोरडे, मानाजी घाडगे, सागरभाऊ साळुंखे, जोतीनाना सावंत आदींनी मनोगत व्यक्त केले. कोपरा सभेपूर्वी विसापूर येथे पदयात्रेद्वारे आ. शिंदे यांनी नागरिकांशी संवाद साधून महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले.
कार्यकर्त्यांना त्रास दिल्यास गाठ माझ्याशी
गेल्या २५ वर्षांहून अधिक काळ आम्ही राजकारण, समाजकारण करत आहोत. आम्ही कधीही सत्तेचा दुरुपयोग केला नाही. मात्र ,काही लाेकांकडून पोलिस यंत्रणेचा गैरवापर करुन कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे प्रकार सुरु आहेत. आम्ही याबाबत आता गप्प बसणार नाही. कोणी जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करत असेल तर प्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी यावेळी दिला.