कोइम्बतूर – तामिळनाडूच्या कोइम्बतूर जिल्हय़ातील मेट्टपालयम तालुक्यातील ओदंथुरई गाव भारतातच नव्हे तर पूर्ण आशियातील सर्वात स्मार्ट गावांपैकी एक आहे. ओदंथुरई अन्य भारतीय गावांप्रमाणेच होते, मूलभूत सुविधांचा अभाव होता, शौचालयांची संख्या पुरेशी नव्हती, विजेची कपात व्हायची, स्वच्छ पेयजलची सुविधा नव्हती. परंतु 1996 पासून या गावात बदल सुरू झाला. तेव्हा आर. शनमुगम हे सरपंच झाले. सरकारकडून उपलब्ध निधीचा योग्य वापर ग्रामीण विकासासाठी करण्याचा निर्धार त्यांनी केला होता.
असे झाले स्मार्ट गाव
गावातील मूलभूत गरजा म्हणजेच स्वच्छ पाणी, शौचालय, वीज, रस्त्यांची पूर्तता करण्यावर शनमुगम यांचा भर होता. या मूलभूत सुविधांची पूर्तता केल्यावर शनमुगम यांच्याकडे 40 लाख रुपयांचा निधी शिल्लक राहिला होता. यातून त्यांनी पवनचक्की निर्माण करण्याचा विचार केला, परंतु याकरता 1.5 कोटी रुपयांची गरज होती. शनमुगम यांनी उर्वरित रकमेसाठी कर्ज घेतले आणि गावात पवनचक्की बसविली. 2017 मध्ये कर्ज फेडण्यात आले आणि आता गाव तामिळनाडू वीज मंडळाला वीज विकून नफा कमावत आहे.
हे गाव पूर्णपणे तामिळनाडू वीज मंडळापासून स्वतंत्र आहे. गावात 25 टक्के वीज सौरघटांद्वारे तर उर्वरित वीज पवनचक्कीद्वारे प्राप्त होते. याशिवाय या गावात कुणीच बेघर नाही. ग्रामपंचायतने ग्रामस्थ आणि काही आदिवासींसाठी 850 घरे निर्माण केली आहेत. येथील प्रत्येक घरात शौचालय आहे. तसेच कर भरणा करण्याप्रकरणी ग्रामस्थ आघाडीवर आहेत. येथील ग्रामपंचायत पूर्ण इमानदारीने शासकीय योजना लागू करते.