सोलापूर – कुरनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने बोरी नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांना सुरक्षिततेच्या सूचना तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिल्या आहेत.
त्याचबरोबर गावपातळीवरील स्थानिक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता बाळगावी. गरज पडल्यास नागरिकांचे स्थलांतर करून त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे व त्यांना निवारा, लाईट, पाण्याची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत.
कुरनूर धरणात रविवारी सायंकाळी पुन्हा मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने रात्रीपासून 2400 क्यूसेक पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी काठोकाठ भरुन वाहत आहे. सध्या बोरी कुरनूर धरणातून 2400 क्यूसेक्स इतक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून यात आणखी पाणी वाढण्याची शक्यता नाकारता येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या सर्व नागरिकांना सुरक्षिततेचा इशारा देण्यात आला आहे.
कुरनूर धरणाची एकूण क्षमता 822 दशलक्ष घनफूट आहे. धरणाला नऊ दरवाजे आहेत. बोरी आणि हरणा नदीवर हे धरण बांधण्यात आले आहे. हे धरण पूर्णपणे तुळजापूर तालुक्याच्या पावसावर अवलंबून आहे.कुरनूर धरणाखाली असलेल्या आठ कोल्हापूरी बंधाऱ्यांना या धरणाचा फायदा होतो. 51 गावांनासुद्धा याचा लाभ होतो.