नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध धरणांमधील पाणीसाठा वेगाने वाढत आहे. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या उरमोडी धरणातून तीन हजार क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येत आहे. धरणाचे दोन दरवाजे एक फुटापर्यंत उचलून शुक्रवारी पाणी उरमोडी नदीत सोडण्यात आले.
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पुन्हा दमदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणे भरल्याने पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे. सातारा तालुक्यात 24 तासांत सरासरी 43 मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर कायम राहिल्याने उरमोडी धरणात साडेआठ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण 92% टक्के भरल्याचे जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी शुक्रवारी सकाळपासून धरणाचे दोन दरवाजे दीड फुटापर्यंत वर उचलून तीन हजार क्युसेक तर वीजगृहातून 400 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार आहे, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.