लोणी धामणी – सध्याच्या वातावरणाच्या सततच्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पाळलं आहे कारण गेली सात ते आठ महिन्यापासून एकही पीक समाधान कारक आले नसल्याने शेती व्यवसाय तोट्यात चालला आहे. शेतातील मशागत, लागवड ते काढणीपर्यंतच्या खर्च व त्यातून मिळालेला नफ्याचा ताळमेळच बसत नसल्याने बळीराजा संपूर्ण अस्मानी संकटामुळे उद्ध्वस्त झाला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी, धामणी, वडगावपीर परिसरात मागील काही वर्षांत पुरेसा पाऊस न पडल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती .मात्र ह्या वर्षी पावसाचे प्रमाण एवढे वाढले की खरीप हंगामातील पिकांना सुध्दा फटका बसून अपेक्षित उत्पन्न काढता आले नाही. या परिसरातील रब्बीतील प्रमुख पिक असणाऱ्या कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. मात्र लागवडीपासूनच मोठ्या अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
साधारणतः ऑक्टोबर महिन्यात कांदा लागवडी सुरू झाल्या परंतु सुरवातीपासूनच काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे मशागत, मजुरी, रोपे आदींचा खर्च वाया गेला, परंतु पुन्हा एकदा उभारी घेत कांदा लागवड करण्यात आली. दोन महिने होत नाहीत, तोच वातावरणातील सतत होणाऱ्या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे.
या परिसरात ढगाळ वातावरणामुळे सलग बावीस दिवस धुके पडल्याने कांद्यावर जांभळा करपा, गाभ्यातील मावा, पात वाकडी, पिवळी होऊन प्रचंड नुकसान झाले आहे. रोगराईला आळा घालण्यासाठी महागडी रासायनिक खते, किटकनाशक, बुरशीनाशक आदी फवारणी खर्च वाढला असल्याने भांडवल खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
वातावरण अजून काही दिवस असेच राहिल्यास मात्र एवढा आटापिटा करून हाता तोंडाशी आलेले कांद्याचे पीक सुध्दा वाया जाण्याची शक्यता आहे. दोन महिन्यांपूर्वी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात आले, मात्र अजूनही नुकसान भरपाई मिळाली नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
लागवड ते काढणी होतोय 45 हजार खर्च कांदा पिकासाठी लागवडीपासून ते काढणीपर्यंत चा एकरी खर्च एकूण चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये इतका असतो. कांदा काढणीसाठी अजून दोन महीने बाकी असून खर्च वारेमाप झाला आहे. परंतु सद्या तरी कांद्याला पोषक वातावरण नसल्याने उत्पादन घटणार आहे. चालू बाजारभावाप्रमाणे विचार केला तर किमान भांडवल वसूल होईल की नाही या बाबत शंका आहे. दोन महिन्यांपूर्वी अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे शासनाच्या कृषी विभागामार्फत पंचनामे करण्यात आले होते.
मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई आली नाही. मुख्यमंत्र्यांनी नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली आहे मात्र त्यातही अनेक निकष सभ्रम निर्माण करणारे आहेत. कर्जमाफी, नुकसान भरपाई मिळेल तेव्हा मिळेल परंतु सध्या तरी बळीराजा सततच्या वातावरणाच्या अस्मानी संकटामुळे पुरा उद्ध्वस्त झाला आहे हे मात्र नक्की.