सासवड -पुरंदर तालुक्यातील एकूण 930.88 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून 2458 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिक व फळ पिकांखालील बाधितांची नोंद आतापर्यंत झाली असल्याचे पुरंदर तालुका कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, यापेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पुरंदर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सलग दुसऱ्यावर्षी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. दरम्यान, यंद करोना व लॉकडाऊनमुळे मार्च-एप्रिल महिन्यात शेतमालांची विक्री न झाल्याने माल शेताततच पडून होते त्यामुळे ते नुकसान. त्यात आता खरीप हंगामाचे हातातोंडाशी आलेले पीक अतिवृष्टीमुळे वाहतून गेले तर अनेक ठिकाणी झोपले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे.
सध्या शेतात बाजरीच्या पिकाची काढणी सुरू आहे. याच काळात हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेण्याचा प्रकार घडला आहे. वाटाणा तर पंचनामा करायलाही शिल्लक राहिलेला नाही. मूग, घेवडा, गाजर, कोथिंबीर, शेपूही पिके पाण्याने अक्षरशः कुजून गेली आहेत. तर भुईमूग पिकाची उंची पाण्यामुळे दोन ते अडीच फूटापर्यंत गेली आहे, मात्र त्याला शेगांचे प्रमाण खूप अल्प आहे. काही भागात तर शेंगाच नाहीत.
डाळिंबाचा तर जमिनीवर अक्षरशः सडाच पडला होता. याशिवाय इतरही पिके नष्ट झाली आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागातील राजुरी, पोंढे, रीसे, पिसे, नायगाव, पिंपरी, मावडी व परिसरात मुसळधार पावसाने बाजरी, भुईमूग, वांगी, टोमॅटो, कारली, वाटाणा, कोथिंबीर, मेथी, पपई, आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.