कामशेत – महाविकास आघाडी सरकारमधल्या तिन्ही पक्षांमध्ये सध्या विसंवादाची दरी आहे. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसचे वर्णन दगाबाज, झोलबाज आणि घोटाळेबाज असे होईल. याशिवाय त्या तीन पक्षातल्या दोन पक्षांचे जे संकेत आमच्याकडे येत आहेत, या सगळ्याचा अभ्यास केला तर अनुमान असे काढता येऊ शकते की राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकेल त्यामुळे राज्यात कधीही निवडणुका होतील, असे भाकित भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष शेलार यांनी कान्हे येथे केले.
भारतीय जनता पार्टी, मावळ तालुका समर्थ बूथ अभियान (बूथ अध्यक्ष सन्मान सोहळा) भाजपा प्रदेशचे वरिष्ठ नेते आमदार आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी “आपलं मावळ, आपलं कमळ’ या घोषवाक्याचे अनावरण आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या वेळी प्रमुख मार्गदर्शक आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीच्या बूथ प्रमुखांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, संघटन सरचिटणीस धर्मेंद्र खांडरे, तालुका प्रभारी भास्कराव म्हाळस्कर, सभापती ज्योती शिंदे, उपसभापती दत्ता शेवाळे, तालुकाध्यक्ष सायली बोत्रे, युवकाध्यक्ष संदीप काकडे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, माउली शिंदे, राजाराम शिंदे, सुकन बाफना, प्रशांत ढोरे, पंचायत समिती सदस्य गुलाब म्हाळस्कर, शांताराम कदम, सुवर्णा कुंभार, जिल्हा परिषद सदस्य अलका धानिवले, धनंजय वाडेकर, जितेंद्र बोत्रे, संघटन मंत्री किरण राक्षे, सरचिटणीस सुनील चव्हाण, मछिंद्र केदारी, अभिमन्यू शिंदे, अमोल केदारी, सागर शिंदे आदी पदाधिकारी, बूथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार आशिष शेलार म्हणाले की, ज्या पद्धतीने तीन पक्षांत आपापसात विसंवादाची लढाई लागली आहे आणि त्या तीन पक्षातल्या दोन पक्षांचे जे संकेत आमच्याकडे येत आहेत, या सगळ्याचा अभ्यास केला तर अनुमान असे काढता येऊ शकते की राज्यात केव्हाही निवडणूक लागू शकेल. अशा परिस्थितीत जेव्हा निवडणूक लागेल, तेव्हा मावळमधला आमदार भाजपाचाच असला पाहिजे, असे जाहीर आवाहन त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना केलं आहे.
शेतकऱ्यांवर गोळीबार;
पोलीस अधिकाऱ्याला “प्राइम पोस्टिंग’
मावळमध्ये शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबार प्रकरणी देखील आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मावळ शेतकरी गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. 185 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचे काम फडणवीस सरकार केले आहे. ज्याने गोळ्या झाडल्या त्याला सध्या मुंबईमध्ये “प्राइम पोस्टिंग’ दिली आहे. मावळमधील शेतकऱ्यांचे खरे शत्रू कोण हे आज पुन्हा एकदा सांगायचं आहे, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
पालकमंत्री, आमदार टार्गेट
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनाच अप्रत्यक्षपणे आशिष शेलार यांनी इशारा दिला आहे. “जो मैं बोलता हूँ वही करता हूँ, और जो मैं नहीं बोलता, वो डेफिनेटली करता हूँ’. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका, पालकमंत्र्यांनी आणि आमदारांनी हे लक्षात ठेवावे, असं आशिष शेलार यावेळी स्पष्ट केले. आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे वर्णन घोटाळेबाज, झोलबाज आणि दगाबाज असे होईल, असे देखील आशिष शेलार यांनी नमूद केले.
राज्य सरकारवर टीकास्त्र
पुण्यातील स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केल्याच्या घटनेवरून देखील आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. पुण्यातला “एमपीएससी’चा विद्यार्थी स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केली. त्याला स्वत:च भविष्य अंधकारमय दिसले. त्याच्या आत्महत्येनंतर 6 जुलैला विधानसभेत उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की 31 जुलैपर्यंत सर्व रिक्त जागा भरू. पण त्यांनी जागा भरण्याच्या प्रस्तावाचा “जीआर’च 31 जुलैला काढला. 30 सप्टेंबरपर्यंत ते आश्वासन पूर्ण करू असे म्हणाले होते, असे शेलार यावेळी सांगितले.