हिंजवडी – ग्रामीण भागातील गरजा लक्षात घेवून विकास सोसायट्यांनी वेगवेगळे व्यवसाय केले पाहिजेत. कर्ज घेऊन नुसतेच नवे-जुने करण्यापेक्षा विकास सोसायट्या गावचे विकासकेंद्र बनल्या पाहीजेत, अशी अपेक्षा राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी मुळशी ऍग्रो भात विक्री केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केली. पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सहकार्याने विकास सोसायट्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर इंद्रायणी भात खरेदी उपक्रमाचा शुभारंभ करताना कवडे बोलत होते.
यावेळी बॅंकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे, कीर्तनकार संतोष पायगुडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, माऊली दाभाडे, राजाभाऊ हगवणे, माजी सभापती पांडूरंग ओझरकर, महादेव कोंढरे, अंकुश मोरे, विनायक ठोंबरे, कालीदास गोपालघरे, प्रवीण शिंदे, दिलीप दगडे, पोपट दुडे, बाळासाहेब विनोदे, अमित कंधारे, दगडूकाका करंजावणे, विजय ढमाले, राम गायकवाड, स्वाती ढमाले, उज्वला पिंगळे, विठ्ठल पडवळ, भगवान नाकती, बबन धिडे, अजित इंगवले, आनंदा घोगरे, माऊली साठे, रामदास पायगुडे, आनंदा घोगरे तसेच शेतकरी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष दुर्गाडे म्हणाले की विकास सोसायट्यांनी गृहोपयोगी वस्तू, खते बी बियाणे, यांची विक्री करणारे व्यवसाय केले पाहिजेत. त्यातून सभासदांना नफा आणि रोजगारही मिळू शकेल. व्यवसायासाठी भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन या चार गोष्टींची आवश्यकता असते. तर व्यवसाय यशस्वी करण्यासाठी मार्केटींग, पॅकेजिंग, जाहिरात आणि सेवा या चार गोष्टी महत्वाच्या आहेत.
पायगुडे महाराज म्हणाले, ज्यातून सर्वांचे कल्याण होईल असा पॅटर्न तयार झाला पाहीजे. मुळशीतल्या शेतकऱ्यांना या योजनेतून हमी भाव मिळणार आहे. शेतीतून अध्यात्माकडेही जाता येते हे यापूर्वीच्या अनेक संतांच्या विचार आचारातून दिसून येते.
प्रास्ताविकात चांदेरे यांनी बॅंकेच्या माध्यमातून तालुक्यात झालेल्या विकास कामाचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे इंद्रायणी भाताला शेतकऱ्याला दर्जानुसार प्रतिकिलो 24 रूपयांऐवजी 27 रूपये देणार असल्याचीही घोषणा केली. शेतकऱ्यांकडून भात घेवून त्यावर प्रक्रिया करून मुळशी ऍग्रो नावाने त्याची विकास सोसायटीच्या माध्यमातून बॅंक विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माऊली दाभाडे यांचेही भाषण झाले. त्यानंतर कवडे यांच्या हस्ते या भात खरेदी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. बॅंकेचे उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, संचालक अंकुश उभे यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेचे पालक अधिकारी सुनील खताळ, विभागीय अधिकारी सुरेश नांगरे, वसुली अधिकारी राजेंद्र मारणे, पौड शाखाअधिकारी बाबासाहेब ववले, सोसायट्यांचे सचिव यांनी या उपक्रमाचे नियोजन केले होते.