पुणे – ग्रामीण भागात विकासकामे करताना त्यांच्या गुणवत्तेकडे लक्ष द्या. किमान स्वत:च्या कार्यकाळात तरी ती कामे टीकतील अशी करा, असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांना आढावा बैठकीत दिला. सुरवातीलाच “दादां’नी कामाच्या गुणवत्तेची “छडी’ मारल्यामुळे सर्वांची बोलती बंद झाली.
मात्र, त्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक विभागाच्या कामाचा पवार यांनी आढावा घेत आवश्यक त्या सूचना केल्या. उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.29) जिल्हा परिषदेत कामकाज आढावा बैठक झाली. मुद्रांक शुल्क यासह विविध विभागांकडून करापोटीचे पैसे जिल्हा परिषदेला येणे बाकी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी पवारांच्या निदर्शनास आणून दिले.
त्यांनी बैठकीतच जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना फोन लावून करापोटीची थकीत रक्कम देण्याच्या सूचना दिल्या. तसेच, मुद्रांक शुल्कचा निधीबाबतही निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. जवळपास एक तास चालेल्या बैठकीमध्ये सर्व विभागाने सादर केलेल्या कामांची माहिती घेऊन पवार यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या. तर, काही विषय हे बैठकीमध्येच संबंधीत अधिकाऱ्यांना फोन लावून सोडविले.