पुणे – “दैनिक प्रभातने निवडलेल्या 40 आदर्श सरपंचांच्या गावाला जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये असा सुमारे दोन कोटी रुपयांचा विकास निधी दिला जाईल,’ अशी घोषणा उच्च-तंत्रशिक्षण मंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी येथे केली.
दैनिक “प्रभात’तर्फे आयोजित “प्रभात आदर्श सरपंच पुरस्कार’ सोहळ्यात पाटील यांच्या हस्ते 40 गावांतील सरपंचांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी ही घोषणा करण्यात आली. “जिल्हा नियोजन समितीच्या विकास निधीतून प्रत्येक गावाला जे पाच लाख रुपये दिले जाणार आहेत, त्या रकमेतून सरपंचांनी या निधीत बसतील ती कामे करून घ्यावीत. यामध्ये मंदिर-शाळा दुरुस्ती, गावातील एखादी सुधारणा करून घ्यावी,’ अशी सूचना पाटील यांनी केली.
तसेच अनेक कंपन्यांना त्यांच्या नफ्यातून काही रक्कम सामाजिक कामासाठी खर्च करावी लागते. त्याला “सीएसआर’ फंड म्हणतात. अनेक कंपन्या आमच्याकडे “सीएसआर’ फंड खर्चण्यासाठी कामे सांगा अशी विनंती करतात. त्यामुळे एकाबाजूला सरकारचे पैसे ज्यावर पालकमंत्री म्हणून माझी स्वाक्षरी असते, असा जिल्हा नियोजन समितीतील पाच लाख रुपयांचा विकास निधी देईनच; परंतु जर गावामध्ये काही मोठी समाजोपयोगी विकासकामे करणार असाल, तर त्याचा प्रस्ताव माझ्याकडे घेऊन या. संबंधित कंपन्यांना तुमच्या गावांमध्ये “सीएसआर’मधून काम करण्याविषयी सुचवू शकतो,’ असे पाटील यांनी यावेळी जाहीर केले.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) August 11, 2023
“महिलांना रोजगार मिळाला पाहिजे, संसारात त्यांचा आर्थिक हातभार लागला पाहिजे, हे नमूद करताना पालकमंत्री पाटील यांनी महिलांना रोजगार निर्मितीसाठी जिल्ह्याच्या नियोजनात 40 कोटी रुपयांची तरतूद असल्याचे सांगितले. त्यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक आहे,’ असेही आवाहन त्यांनी सर्व सरपंचांना केले.