भुईंज,(प्रतिनिधी) – शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून पिकवलेले टोमॅटोला बाजारपेठेत कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे टोमॅटो फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत अनेक शेतकरी भाजीपाल्याचे उत्पादन घेतात.
मात्र, टोमॅटोला दर नसल्याने टोमॅटो उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक विवंचनेतून मार्गक्रमण करत असल्याचे चित्र वाई तालुक्यासह सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे दर मिळत नसल्यामुळे खर्च तर सोडाच गाडी भाडे ही खिशातून देण्याची वेळ सध्या शेतकऱ्यावर येऊन ठेपली आहे.
कधी अवकाळी तर कधी मातीमोल बाजारभावामुळे निसर्गाच्या दृष्ट चक्रातून मार्गक्रमण करणाऱ्या बळीराजाला यंदा दोन्ही संकटातून मार्गक्रमण करण्याची वेळ आली आहे. वाई दुष्काळ तालुक्यात असताना काही शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीला फाटा देत टोमॅटोची लागवड केली. त्यामध्ये कोबी, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर या पिकांना सध्या दर मिळत नाही. त्यामुळे शेतकरी सध्या अस्मानी पाठोपाठ सुलतानी संकटामुळे पुरता आर्थिक व मानसिक दृष्ट्या संकटात सापडला आहे.
सध्या बाजारात कांद्यासह सर्व शेतीमालास दर मिळत नाही. कमी भावात उत्पादन खर्च तर सोडाच मात्र शेतातून बाजारपेठेत नेहण्याचा खर्चही शेतकऱ्यांच्या हातात पडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सध्या मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागत आहे. सध्या भाजीपाला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरयांची आथिर्कदृष्ट्या पिळवणूक होत आहे. दुसरीकडे व्यवसायिक मात्र हात धूवून घेत करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे भाजीपाला पिकाला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
शेतकरी फक्त शेतीवर अवलंबून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतात. मुख्यतः लहान मुलांप्रमाणे जपलेला टोमॅटो पिकाला डोळ्यासमोर उध्वस्त होताना शेतकरी हातबल झाल्याचे बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे पीक तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतले आहे. टोमॅटो भाजीपाला पिकांसाठी लाखो रुपये खर्च करून उत्पादन घेतले जाते. मात्र आज भाजीपाला फेकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे.
केलेला खर्चही भरून काढणे कठीण
टोमॅटोला एका एकरातील पिकांसाठी साधारणता पन्नास हजार रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे तोडण्यासाठी मजुरी सुद्धा दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु घातलेला खर्चही भरून काढणे कठीण झाले आहे त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनाही कृषी उत्पादनच्या प्रक्रिया उद्योगाकडे वळणे काळाची गरज पडली आहे. त्यामुळे पिकांचा काढण्याचा खर्च गाडी भाडे सुद्धा निघत नसल्यामुळे तूर्तास बळीराजा हवालदिल झाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कोथिंबीरला सुद्धा चांगली मागणी असते. परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात कोथिंबीर बाजारात येत असल्याने तिचे भाव घसरल्याचे दिसून येत आहे.