राहू -उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील काही दिवसांपूर्वी भीमा पाटस दुप्पट क्षमतेने चालू होईल असे वक्तव्य केले होते. त्यामुळे सर्वसामान्यां बरोबरच राजकीय पुढाऱ्यांना देखील विचार करणे भाग पडले होते. कारण भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष हे राहुल कुल आहेत. ते सध्या विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मागील विधान सभेत राहुल कुल यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पराभव केला होता. परंतु नंतर अजित पवार व राहुल कूल अनेक कार्यक्रमात एकत्र आलेले होते. तसेच करोना काळात आमदार कुल यांनी चांगले काम केले आहे. रमेश थोरात हे दीर्घकाळ पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष व विद्यमान संचालक आहेत. याच बॅंकेचे साधारणपणे दीडशे कोटींचे कारखान्यावर
कर्ज आहे.
हा कारखाना परराज्यातील मोठ्या कारखानदाराला चालवायला देण्याबाबत वरिष्ठ पातळीवर नियोजन सुरू होते. त्यामध्ये कारखाना टेकओव्हर करणे किंवा इतर पर्यायावर विचार सुरू होता. त्याला यश आल्यात जमा होते. कारखान्यावरील जिल्हा बॅंकेच्या कर्जाची एकरकमी परतफेड ते करणार आहेत. त्यामुळे भीमा पाटस कारखाना दुप्पट क्षमतेने सुरू होईल, असेही त्यांनी सांगितले.
कारखान्यावर असलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कर्जामुळे हा साखर कारखाना आर्थिक संकटात सापडुन बंद पडला आहे.
अजित पवार यांच्या घोषणेनंतर मागील दोन वर्षांपासून बंद असलेला भीमा पाटस साखर कारखाना आता पुन्हा सुरू होणार आहे. कारखाना संकटात जाण्यासाठी व बंद पडण्यासाठी केवळ कारखान्याचे अध्यक्ष राहुल कुल हे जबाबदार असल्याची टीका रमेश थोरात सातत्याने करत आहेत. साखर कारखान्याला जिल्हा बॅंकेकडून जप्तीची नोटीस देण्यात आली तेंव्हा थोरात हेच जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष होते. त्यामुळे थोरात-कुल यानिमित्ताने आमने-सामने आले होते. बऱ्याच दिवसांपासून दौंड तालुक्यातील राजकारण या कारखान्याभोवती फिरत असल्याचे पाहायला मिळत आहे.
दोन्ही दादा पॉवरफुल्ल
पुणे जिल्ह्यातील दोन्ही दादा एकत्र आल्यास दौंडमध्ये एक वेगळे समीकरण पहावयास मिळू शकते. अजित पवार हे तडफदार व प्रशासनावर पकड असणारे नेते आहेत. तर राहुल कुल हे अभ्यासू व धोरणात्मक निर्णय घेणारे आमदार आहेत, हे त्यांनी झालेल्या अधिवेशनात दाखवून दिले आहे. त्यामुळे दोन्ही दादांची आपली पकड राजकारणात पक्की असल्याचे दिसून येत आहे.