खंडाळा – खंडाळा तालुक्यातील गुरुकृपा पतसंस्थेमध्ये झालेल्या 2 कोटी 29 लाख रुपयांच्या अपहाराप्रकरणी विविध मागण्यासाठी पतसंस्थेतील ठेवीदार पुन्हा एकदा उपोषणास बसले आहेत. याबाबत खंडाळा तहसीलदारांना शिवाजी जगताप व अन्य ठेवीदारांच्यावतीने निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये असे म्हटले की, पतसंस्थेमधील आजपर्यंत सर्व ठेव रक्कम व्याजासह मिळावी, ही आमची प्रमुख मागणी आहे. यापूर्वी 2 ऑगस्ट रोजी याच ठिकाणी उपोषणाला बसलो असताना आमदार, तहसीलदार, सहाय्यक निबंधक व तत्कालीन पोलीस निरीक्षक यांनी एकत्र येऊन संस्थेचे संस्थापक राजेंद्र चव्हाण, इतर संचालक व सर्व ठेवीदार यांच्यात समेट घडवली. फेब्रुवारी 2024 अखेर ठेव रकमा परत देण्यात येतील, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले होते.
परंतु, संस्थेच्या संचालक मंडळाने आजअखेर ठेवी परत केल्या नाहीत, संचालक मंडळावर ठेवीदारांची फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा, शासकीय ऑडिट आतापर्यंत झाले नाही, सर्व ठेकेदार कर्जबाजारी झालं असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या सर्व बाबींसाठी संस्थेचे संस्थापक राजेंद्र चव्हाण, चेअरमन जगताप, संचालक मंडळ, कर्मचारी, लेखापरीक्षक हे सर्व जबाबदार आहेत व यांच्यावर भ्रष्टाचार व फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन सर्व ठेवीदारांना न्याय मिळावा, असे या ठेवीदारांनी निवेदनामध्ये म्हंटले आहे.