नवी दिल्ली – दिल्लीत दंगलीबद्दल केंद्र सरकारच्या निष्क्रीयतेच्या विरोधात तसेच गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉंग्रेसच्या खासदारांनी आज संसद भवन परिसरात जोरदार निदर्शने केली. त्यात पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित होते.
भारत बचाव, मोदी मस्ट अन्सर, शहांनी राजीनामा द्यावा असे लिहीलेले फलक हातात धरून कॉंग्रेस खासदारांनी निदर्शने केली. या संबंधात बोलताना अधिर रंजन चौधरी म्हणाले की जेव्हा दिल्ली जळत होती त्यावेळी आपले गृहमंत्री अहमदाबादेत ट्रम्प यांच्या स्वागताची लगबग करण्यात व्यस्त होते. पण जेव्हा आपले नागरीक ठार मारले जात होते त्यावेळी महत्व किंवा प्राधान्य कशाला द्यायचे हे देशाच्या गृहमंत्र्यांना कळायला हवे होते असे ते म्हणाले.
दिल्ली दंगलीबद्दल पंतप्रधान तीन दिवसांनी ट्विटरवर बोलले, पण गृहमंत्र्यांनी एक शब्दही काढला नाही. शेवटी स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अजित डोवाल यांना तिथे पाठवावे लागले हे सरकारचेच अपयश आहे. पत्रकारांशी बोलताना शशी थरूर म्हणाले की दिल्लीत जे काही झाले त्याची संसदेत चर्चा व्हायला हवी आहे.
अमित शहा यांनी गृहमंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडली नाही, म्हणून त्यांनी त्वरीत राजीनामा दिला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. दिल्ली दंगलीच्यावेळी पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेतल्याचा आरोपही कॉंग्रेस नेत्यांनी केला. कॉंग्रेस अध्यक्षांनी दिल्ली दंगलींची प्रत्यक्ष जागेवर जाऊन चौकशी करण्यासाठी पाच जणांची एक समिती नियुक्त केली असून या समितीने कॉंग्रेस अध्यक्षांना आपला अहवाल सादर केला आहे.