इंद्रायणीनगर – उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असली तरी उघड्यावर शीतपेयांना मागणी वाढली असून त्याच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दर्जेदार नसल्यास नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे शीतपेय आणि खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या शीतपेयांची, खाद्याच्या नमुन्यांची तपासणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) करावी, अशी मागणी होत आहे.
उन्हाळ्याला सुरुवात होताच शहराच्या सर्वच भागांत आणि प्रामुख्याने शहरातील मुख्य रस्त्यांवर शीतपेय विक्रीची अनेक दुकाने थाटली आहेत. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना उन्हाच्या तडाख्यात ही शीतपेये दिलासादायक वाटतात. त्यामुळेच या शीतपेयांना मागणी वाढते. शहरातील थंड पाणी, कोल्ड्रिक्स, उसाचा रस, कैरी पन्हे, मठ्ठा, ताक, लस्सी, सरबत, ज्यूस, आईस्क्रीम, रसवंती, बर्फगोळा, कुल्फी, फळे, फळांच्या फोडी, सॅलड, भेळपुरी, पाणीपुरी, शेंगदाणे, चाट विक्रेते, फास्ट फूडविक्रेते यांच्यावर नियंत्रण दिसत नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशीच हा खेळ होत असल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. चव किंवा रंगांचे पदार्थ प्रमाणातच वापरावेत. छापील किमतीपेक्षा जास्त दराने शीतपेयांची विक्री करणे गुन्हा आहे. मात्र, हे नियम कागदावरच राहिले आहेत.
“एफडीए’कडे नोंदणी बंधनकारक
विक्रेत्यांकडची शीतपेये आरोग्यास हितकारक आहेत की नाही, याची शहानिशा करण्याची आणि अशा विक्रेत्यांना परवाना देण्याची जबाबदारी एफडीएकडे आहे. अन्नसुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार तर अन्नपदार्थ आणि शीतपेयांची विक्री करणाऱ्या सर्वच फिरत्या विक्रेत्यांना एफडीएकडे नोंदणी बंधनकारक आहे. या परवानगीशिवायच अनेक विक्रेते भोसरी, चऱ्होली, मोशीमध्ये सर्रास शीतपेय विक्री करीत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध रंगांचा वापर करून शीतपेयांची विक्री करतात. प्रत्यक्षात नैसर्गिक रंगांचे किंवा आयएसआय मार्क असलेले रंगच वापरणे आवश्यक आहे.
दर्जा उत्तमच
आम्ही नागरिकांच्या आरोग्याशी खेळत नाही. अनेक वर्षांपासून आम्ही हाच व्यवसाय करत असून परवाना नसला तरी आमच्या उत्पादनाचा दर्जा उत्तमच असतो, अशी माहिती भोसरीतील शीतपेय विक्रेत्याने दिली.