नवी दिल्ली – भारतात तयार होत असलेल्या उत्पादनांना जगभरातून मागणी वाढते आहे, तसंच भारताची पुरवठा साखळी व्यवस्था मजबूत होत चालली असल्याचं दिसतं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ८७वा भाग होता. देशानं मागच्याच आठवड्यात ३० लाख कोटी रुपयांच्या निर्यातीचं लक्ष्य साध्य केल्याची माहिती त्यांनी दिली. ही बाब अर्थव्यवस्थेपेक्षाही भारताचं सामर्थ्य आणि क्षमतेशी संबंधित आहे असं ते म्हणाले.
जेव्हा देशाच्या स्वप्नांपेक्षाही देशाचे संकल्प मोठे असतात, तेव्हाच देश विराट पावलं उचलू शकतो, असं त्यांनी सांगितलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी उस्मानाबादच्या हातमाग उत्पादनांसह, नवी उत्पादनं प्रयत्नपूर्वक नव्या देशात निर्यात केली जात असल्याची उदाहरणही मांडली. लोकलला ग्लोबल बनवून आपल्या उत्पादनांची प्रतिष्ठा वाढवायचं आवाहन त्यांनी केलं.
देशांतर्गत पातळीवर गव्हर्नमेंट ई मार्केट अर्थात ई जेम च्या माध्यमातून लघुउत्पादकांना त्यांची उत्पादनं सरकारला विकण्याची मिळवून दिलेली संधी आणि त्याअंतर्गत झालेल्या खरेदीविषयीची माहिती त्यांनी दिली. हे नव्या भारताचं उदाहरण आहे, आणि नवा भारत केवळ मोठी स्वप्नंच बघत नाही, तर ते लक्ष्य गाठण्याची हिंमतही दाखवतो, याच साहसाच्या जोरावर आपण आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जगभराचा आयुर्वेदाकडे वाढलेला ओढा तसंच आर्युवेदाशी संबधित आयुष उद्योग क्षेत्रात वाढलेली संधी आणि वाढते स्टार्टअप याबद्दलची माहिती त्यांनी दिली.
जल बचतीसाठी जनतेनं वैयक्तिक तसंच संयुक्तपणे शक्य ते प्रयत्न करावेत, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात, देशभरात प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी ७५ अमृत सरोवर बनवता येवू शकतील, असं ते म्हणाले. येत्या ११ एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले, तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याचा उल्लेख करून, त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रिबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचं स्मरण केलं. या तीनही व्यक्तीमत्वांच्या कार्यातून शिकण्यासाठी, त्यांच्याशी संबंथित स्थानांना भेटी द्यायचं आवाहन त्यांनी जनतेला केलं आहे.