नवी दिल्ली – 1999 च्या कारगिल युद्धात पाकिस्तानवर विजय मिळवून 24 वर्षे पूर्ण झाल्याच्या स्मरणार्थ भारतीय सैन्याने तिन्ही दलातील सर्व महिलांसाठी राष्ट्रीय युद्ध स्मारक, दिल्ली ते कारगिल युद्ध स्मारक, द्रास (लडाख) दरम्यान नारी सशक्तिकरण महिला मोटरसायकल रॅलीचे आयोजन केले आहे.
नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकापासून महिलांच्या मोटरसायकल रॅलीला लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. तिन्ही दलातील एकूण 25 सदस्यीय संघात दोन वीर नारींचा समावेश आहे, त्यापैकी एक सेवारत अधिकारी आहे, तसेच 10 सेवारत भारतीय लष्करी महिला अधिकारी, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदलातील प्रत्येकी एक महिला अधिकारी, भारतीय लष्कराच्या तीन महिला सैनिक आणि आठ सशस्त्र महिला सैनिकांचा यात समावेश आहे.
हा चमू कारगिल युद्धातील सशस्त्र दलांच्या निर्णायक विजयाचा उत्सव साजरा करेल आणि बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करेल. रॅली एकूण अंदाजे 1000 किलोमीटरचे अंतर कापेल.
ज्यामध्ये हा चमू हरियाणा, पंजाबचा मैदानी प्रदेश आणि जम्मू-काश्मीर तसेच लडाखच्या उंच पर्वतीय खिंडीतून 25 जुलै 23 रोजी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकापर्यंत पोहोचेल. रॅलीदरम्यान, हा चमू राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, विविध शाळा/महाविद्यालयातील विद्यार्थी, दिग्गज आणि वीर नारी यांच्याशी संवाद साधेल.