देशासाठी बलिदान केलेल्या जवानांविषयी कृतज्ञता म्हणून द्रासजवळ महामार्गावर “कारगिल युद्धस्मारक’ उभारण्यात आले आहे. 1947 पासून तसंच कारगिलच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या जवानांचे नामफलक या ठिकाणी लावलेले आहेत. या जवानांच्या त्यागाचं स्मरण आणि भारताच्या विजयाची आठवण म्हणून दरवर्षी 26 जुलै रोजी “कारगिल विजयदिवस’ साजरा केला जातो.
अलीकडच्या काळात सर्वाधिक उंचीवर म्हणजे पंधरा ते सतरा हजार फूट उंचीवर लढलं गेलेलं युद्ध म्हणून कारगिल इथलं युद्ध ओळखलं जातं. फेब्रुवारी 1999मध्ये कारगिल, द्रास, बटालिक सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी करून मोक्याच्या जागी तळ ठोकले. सुरुवातीला नेहमीप्रमाणे यात पाकिस्तानी सरकारचा हात नाही असा देखावा त्या देशाने केला. पण हे थेट पाकिस्तानी सैनिकांचं नियोजनबद्ध केलेलं आक्रमणच होतं हे स्पष्ट दिसत होतं.
170 किलोमीटरच्या पट्ट्यात ताबारेषेपासून आठ किलोमीटरपर्यंत त्यांनी घुसखोरी केलेली होती.या भागात अतिउंच डोंगर, आकाशाला भिडणारी शिखरं, खोल दऱ्या असा रौद्रभीषण निसर्ग आहे. श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गावर कारगील, द्रास, बटालिक या टापूमधलं तपमान शून्याच्या खाली. इथं तुफान हिमवृष्टी होते. कारगिलचा श्रीनगरशी संपर्कच तुटतो.
अशा ठिकाणी वास्तव्य करणं मानवासाठी महाकठीण. इंचाइंचावर मृत्यू जाळे पसरून बसलेला. पाकिस्तानने मुद्दाम असा दुर्गम भाग लढाईसाठी निवडला. डोंगरावरच्या मोक्याच्या ठिकाणांवर कब्जा मिळवला. त्यांचा उद्देश असा होता की, श्रीनगर-लेह या महत्त्वाच्या महामार्गाचा कब्जा घेऊन भारतीय लष्कराची रसद तोडून टाकायची.
मात्र पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या घुसखोरीला चोख प्रत्युत्तर भारतीय जवानांनी दिले. नियोजनपूर्वक शत्रूच्या सैनिकांनी अशा जागा निवडल्या होत्या की, ते उंचावर होते आणि आपले सैनिक खालून त्यांचा प्रतिकार करीत होते. अर्थातच यामध्ये अनेक सैनिकांना प्राणार्पण करावे लागले. पण अतुलनीय शौर्य दाखवून भारताने 26 जुलै या दिवशी रोमहर्षक विजय मिळवला.
आपल्या सर्वोच्च त्यागानं नवा इतिहास घडवला. वरच्या पहाडीवरून येणाऱ्या तोफगोळ्यांना तोंड देत, अकरा आठवड्याच्या तुंबळ युद्धानंतर टोलेलिंग शिखर, टायगर हिल शिखर अशा अतिउंच, बर्फाळ शिखरांवर भारतीय लष्कराने तिरंगी झेंडा फडकावला. टोकाची प्रतिकूल परिस्थिती असताना अशक्य ते शक्य करून दाखवले.
उणे तीस अंश तापमान असल्यामुळे प्राणवायूची कमतरता आणि अतिशय मोक्याच्या ठिकाणी सुसज्जपणे बसलेला, कर्दनकाळ ठरणारा शत्रू. 80 अंशाची खडी चढण चढत असताना अचानक वरून भरमसाठ बंदुकीच्या फैरी उडू लागतात. शत्रू वरच्या बाजूला असल्याने त्याच्यापासून लपणे कठीण आणि त्याच्या टप्प्यात आले की, तो आपल्याला दिसण्यापूर्वीच तोफगोळे. मग आख्खा दिवस लपून काढायचा आणि रात्री कूच करून शत्रूला गारद करायचं.
कधी गळाभर बर्फात रुतले जायचे जवान. तसेच कसेतरी बाहेर निघून “सदैव सैनिका पुढेच जायचे…’ असे मनाशी म्हणत वाटचाल सुरू करायची. या कारगिल युद्धात कर्नल वांगचुक यांच्याकडचा शस्त्रसाठा संपल्यावर शत्रूच्या डोक्यावरील पहाडावर ते चढून गेले आणि मोठमोठ्या शीळा त्यांच्या अंगावर टाकून त्यांनी विजयश्री खेचून आणली. तिथूनच “ऑपरेशन विजय’च्या यशोगाथेला सुरुवात झाली.
अत्यंत खडतर हवामानात आजही आपले जवान डोळ्यात तेल घालून या सीमेवर पहारा देत आहेत. ते राहतात कसे तिथे? पत्र्याचं दार असलेल्या टपरीत. आत एक दगडी बाक. त्यावर विश्रांती घ्यायची. एक पत्र्याची पेटी. त्यावर देवाची मूर्ती वगैरे. मात्र या सैनिकांची त्याबाबत मुळीच तक्रार नाही. उलट त्यांच्या मते ते “मजेत’ आहेत.
क्वचित कोणी पर्यटक तिथपर्यंत पोचले तर आपले लष्करी अधिकारी त्यांना विनंती करतात, “जरा आपल्या ईशान्येच्या राज्यांत उभ्या असलेल्या सैनिकांनाही भेटा. शत्रू समोर नसतो तेव्हासुद्धा त्यांचं रोजचं आयुष्य म्हणजे लढाईच आहे.’ उंच डोंगरांच्या खालच्या टप्प्यावरचे सैनिक सांगतात, “आम्हाला निदान कधीतरी माणसांची तोंडं तरी दिसतात. आमचे काही सैनिक याहीपेक्षा उंच पहाडांवर बंदुकीच्या दस्त्यावर बोट ठेवून तासंतास जागरूकतेने एकटेच उभे असतात.’ स्वतः कितीही खडतर परिस्थितीत असले तरी सहजपणे ते आपल्या सहकाऱ्यांचं कौतुक करतात.
साधी चार-पाच थर असलेली दहीहंडी फोडली तरी आपल्या मुलांना ते केवढं शौर्य वाटतं. पण हे जेमतेम बावीस-तेवीस वर्षांचे जवान जीवावर उदार होऊन, लढा देत असूनही स्वतःबद्दल बोलायचं म्हणजे त्यांना मोठंच संकट वाटतं. आपण जे काही केलं, जे काय करतो आहोत, ते काही विशेष नाही अशी सर्वच सैनिकांची भावना असते.
18 हजार फूट उंचीवर जाऊन शत्रूचा सामना कसा केला, भारताच्या लष्कराने शत्रूला कसा धडा शिकवला; याबद्दल ते काहीही बोलत नाहीत. त्यात जर हे सैनिक लेह-लडाख या पहाडी भागातले असतील तर अधिकच शांत, संयमी आणि मितभाषी. एखाद्या लढाईतील त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आपण कौतुकानं विचारलं तर, ते विनयानं म्हणतात, “कर्तृत्व वगैरे काही नाही. आम्ही आमची ड्यूटी बजावत होतो.’ कधी म्हणतात, “देवाची कृपा. नशिबानं साथ दिली. माझ्या जवानांनी कमाल केली.’
न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची चढाओढ लागण्याच्या काळात स्वतःला चुकूनही श्रेय न घेणारे हे जवान… खरोखर आपण निःशब्द होतो त्यांच्यापुढे. कारगिलच्या रस्त्यावर एक छोटा पूल लागतो. तिथे एक पाटी लावलेली दिसते, “आय ओन्ली रिग्रेट दॅट आय हॅव बट वन लाइफ टू ले डाउन फॉर माय कन्ट्री.’
-माधुरी तळवलकर