नवी दिल्ली :- दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या तुफानी पावसामुळे यमुना नदीला आलेल्या पुरामुळे दिल्लीतील अनेक भाग जलमय झाला आहे. हे पाणी सुप्रीम कोर्ट इमारतीच्या गेटपर्यंत पोहचलेले दिसले आहे.
दरम्यान आज सकाळी पाण्याची पातळी किंचीत ओसरलेली दिसली. सध्या यमुनेतील पाण्याची पातळी 208.35 मीटरपर्यंत खाली आली, काल गुरूवारपासून पाण्याची पातळी वाढू लागली होती आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 208.66 मीटरवर पोहोचली होती.
ही पातळी धोक्याच्या खुणेच्या तीन मीटरपेक्षा वर आहे. या पावसाने दिल्लीचे गेल्या 45 वर्षातील सारे विक्रम मोडले आहेत. या महानगरीचा मोठा भाग पाण्याखाली आल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे.
अनेक महत्वाच्या रस्त्यांवरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. दिल्ली सरकारने आपली सारी यंत्रणा नागरीकांच्या मदतीसाठी लावली आहे. ठिकठिकाणी मदत पथके तैनात आहेत.