– हेमंत महाजन
चीनशी आपण तोंड देऊ शकत नाही, अशा प्रकारचे मन परिवर्तन करण्यासाठी सध्या चीन न्यूरो-वॉरफेअरचा वापर करीत आहे. याचा भारतावरही परिणाम होऊ शकतो.
“न्यूरो-वॉरफेअर’ म्हणजे काय?
चीन हा भारत, अमेरिका आणि पाश्चात्त्य देश यांच्याविरुद्ध “मल्टी डोमेन वॉर’ (विविध क्षेत्रांमधील युद्ध) लढत आहे. ज्याला “अनिर्बंध युद्ध’ (अनरिस्ट्रिक्टेड वॉर) असेही म्हटले जाते. युद्ध चालू नसताना शांतता काळात आपल्या प्रतिस्पर्धी देशांना आपण लढाई हरलो, आपण चीनशी लढू शकत नाही, चीन फार शक्तिशाली आहे, त्यामुळे आपण चीनचे ऐकले पाहिजे, असे वाटण्यास भाग पाडायचे’, हा या “न्यूरो-वॉरफेअर’चा उद्देश आहे. हे एक मानसिक युद्ध अर्थात मनपरिवर्तन करण्याबाबतचे युद्ध आहे.
80 च्या दशकामध्ये अशा न्यूरो शास्त्रांचा वापर त्या वेळेचे सोव्हिएत युनियनचे राष्ट्रपती गार्बोचेव्ह यांच्या विरोधात केला असावा, असा एक समज आहे. कारण, त्यांनी त्यानंतर ग्लासनोस्ट आणि पेरेस्ट्रायका अशी दोन तत्त्वे वापरायला सुरुवात केली आणि त्यानंतर सोव्हिएत युनियनचे अनेक तुकडे झाले. चीनच्या मानसिक युद्धाचा अनुभव भारताने गलवान युद्धाच्या वेळी घेतला आहे. त्या वेळी गलवानमध्ये चीनचे बळ पुष्कळ आहे, चीनकडे पुष्कळ शस्त्रे आहेत,
त्यांचे 50 ते 60 हजार सैनिक सीमेवर आले आहेत, त्यांची हेलिकॉप्टर्स आणि विमानेही तेथे आहेत. चीन भारताहून वरचढ आहे, असे सांगण्यात येत होते; पण चीनला प्रत्युत्तर देण्यासाठी भारताचीही सिद्धता आहे, असे सांगितले जात नव्हते. अर्थात, या मानसिक युद्धाचा परिणाम भारताचे राजकीय नेतृत्व आणि सैन्य यांच्यावर झाला नाही; पण परिणाम आपल्या काही प्रसिद्धी माध्यमांवर निश्चित झाला. त्यामुळे अशा माध्यमांमध्ये चीन भारताहून वरचढ आहे, अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या.
“न्यूरो-वॉरफेअर’ उद्देश आणि परिणाम
चिनी कम्युनिस्ट पक्ष आणि चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी अशा प्रकारच्या उच्च तंत्रज्ञानाची शस्त्रे तयार करत आहे. कुठल्याही एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या मेंदूवर परिणाम करण्याचे काम हे शस्त्र करू शकतील. चीन विरोधी देशांचे राजकीय नेते, नोकरशहा, सैन्याचे प्रमुख अशा महत्त्वाच्या लोकांच्या विरोधात ही शस्त्रे वापरू शकतो. त्यांच्या मनावर परिणाम केला, तर ते चीनशी लढाई करण्यास घाबरतील आणि लढाई सुरू होण्यापूर्वीच चीन ही लढाई जिंकू शकेल. विशिष्ट उपकरणे/शस्त्रे/बंदुकीच्या माध्यमातून व्यक्तीच्या मेंदूवर किरण सोडले, तर त्याच्या मेंदूवर परिणाम होऊ शकतो. ही शस्त्रे थोड्या काळासाठी वापरता येतात. ज्याच्या मेंदूवर या शस्त्राचा वापर करण्यात येतो, त्याच्या विचारसरणीत बदल होतो.
“न्यूरो-वेपन्स’वर नुकताच 12 पानांचा एक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. “इन्युमरेटींग टार्गेटिंग अँड कोल्याप्सिंग चायनीज कम्युनिस्ट पार्टीज न्यूरोस्ट्राइक प्रोग्रॅम,’ जे मेंदूच्या विरोधातील शस्त्र आहे, त्या शस्त्राचे काही उद्देश आहेत. शत्रू राष्ट्रातील महत्त्वाच्या लोकांच्या मनावर परिणाम करायचा. त्यांना वाटले पाहिजे, “आपल्या देशाचे सरकार अकार्यक्षम आहे, ते चांगले काम करत नाही आणि त्याची बदली झालीच पाहिजे.’ या शस्त्राच्या माध्यमातून देशाची लढण्याची शक्ती खच्ची करण्यात येते. देशाची मनोबल/शक्ती त्याच्या सैन्याच्या पाठीशी उभी असेल, तर ते सैन्य अधिक चांगली लढाई करू शकते.
याउलट जनतेने सैन्याच्या कामात अडथळे आणले, तर युद्ध परिस्थितीवर फार प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे अशा शस्त्रांच्या माध्यमातून आपले सरकार निष्क्रिय असून, चीनची प्रगती वेगाने होत आहे, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. राजकीय नेते, नोकरशाही, सैन्याचे अतिउच्च अधिकारी यांचे खच्चीकरण करायचे आणि युद्ध चालू होण्यापूर्वीच युद्धात पराभव होणार आहे, हे त्यांना मान्य करायला लावायचे, असा उद्देश या “न्यूरो-वॉरफेअर’चा आहे.
“न्यूरो-वेपन्स’चा वापर कुणाविरोधात?
“न्यूरो-वेपन्स’विषयी वॉशिंग्टन पोस्ट आणि अन्य वर्तमानपत्रांमध्ये लेख प्रकाशित झाले आहेत. ते सार्वजनिक क्षेत्रांमध्ये उपलब्ध आहेत. असे म्हटले जाते की, या विषयामध्ये चीन सर्वांत पुढे आहे. चीन या शस्त्राचा वापर चीनमधील किंवा चीनच्या बाहेर तिबेटी, उईघूर मुस्लीम, मंगोलियन या चिनी शत्रूंच्या विरोधात करील. चीनचे 5 कोटींहून अधिक नागरिक देशाबाहेर राहतात. जे चीनच्या विरोधात काम करतात, त्यांच्या विरोधातही हे शस्त्र वापरले जाऊ शकते. चीनचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू अमेरिका आहे.
न्यूरो-वॉरफेअर- भारतावरील परिणाम
भारत फार मोठा देश आहे. भारताची सीमा पुष्कळ मोठी आहे, लोकसंख्या पुष्कळ आहे आणि भारताचे सैन्यही अतिशय सक्षम आहे. त्यामुळे भारताला सर्व बाजूंनी वेढण्याची शक्ती चीनकडे नाही. हे लक्षात घेऊन चीन भारताच्या विरोधात काही महत्त्वाच्या भागात म्हणजे राजधानी दिल्ली व महत्त्वाच्या व्यक्तींच्या विरोधात “न्यूरो-वॉरफेअर’ करू शकतो. “न्यूरो-वेपन्स’च्या विकासावर लक्ष ठेवण्याकरता, न्यूरो-वेपन्स’चा परिणाम कमी करण्यासाठी अमेरिकेशी किंवा चीन विरोधी राष्ट्रांची मैत्री करून भारताला लाभ होऊ शकतो; मात्र चीन, अमेरिका केवळ त्याच्या हिताचे पाहील, असे विचार भारतीयांच्या मनात निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहे. मात्र यात चीनला फारसे यश मिळालेले नाही.
“न्यूरो-वेपन्स’चे प्रयोग सुरूच राहतील
“मल्टी डोमेन वॉर’ (विविध क्षेत्रांमधील युद्ध)चा एक भाग म्हणून या शस्त्राच्या माध्यमातून चीनला भारताची प्रगती थांबवयाची आहे. त्यामुळे चीन हे शस्त्र भारतीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात असलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या विरोधात वापरू शकतो. याचा भारताच्या युद्धक्षमतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चीन अशा प्रकारचे प्रयोग येणाऱ्या काळात करतच राहणार आहे. लढाई न करता आपणच कसे शक्तिशाली आहोत, हे चीनला दाखवून द्यायचे आहे. चीन अशी शस्त्रे वापरत आहे आणि वापरत राहील.
त्यामुळे भारतानेही त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी “न्यूरो-वॉरफेअर’ करायचे का?’, असा प्रश्न निर्माण होत आहे. निश्चितच हे युद्ध भारतालाही करता आले पाहिजे. ती क्षमता निर्माण होण्यास वेळ लागेल; म्हणून अशा शस्त्रांवर संशोधन केले जावे. चीन जसे विविध शस्त्र भारताच्या विरोधात वापरतो, तसे भारतानेही चीनच्या विरोधात, ही शस्त्रे वापरण्याचे प्रयोग केले पाहिजेत. चीनला “जशास तसे’ ही भाषा कळते. त्यामुळे चीनच्या शस्त्राला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानेही तशी शस्त्रे सिद्ध करायला पाहिजेत.