नवी दिल्ली – करोनाचा धोका अद्याप कायम असल्याने येत्या काळात देशातील सर्व परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच विविध क्रीडापटूंना सरावाची परवानगी देण्याचा विचार करु, असे स्पष्टीकरण केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी दिले आहे.
भारतीय हॉकीपटू तसेच अन्य क्रीडा प्रकारातील खेळाडूंनी सरकारकडे सरावासाठी परवानगी मागितली होती, त्यावर रिजीजू यांनी आपले मत व्यक्त केले आहे. मार्च महिन्यापासून देशात करोनामुळे विविध स्पर्धा एकतर रद्द करण्यात आल्या आहेत तर, काही स्पर्धा लांबणीवरही टाकण्यात आल्या आहेत. पुढील वर्षी होणारे ऑलिम्पिक तसेच यंदा होत असलेल्या पात्रता स्पर्धा तसेच जागतिक पातळीवरील विविध स्पर्धांसाठी भारतीय खेळाडू सहभागी होतील मात्र, स्पर्धेतील कामगिरीपेक्षाही त्यांच्या आरोग्याची काळजी जास्त आहे, असेही रिजीजू यांनी स्पष्ट केले आहे.
ऑलिम्पिकला यापूर्वीच पात्र ठरलेल्या खेळाडूंना भारतीय क्रीडा प्राधिकरणात (साई) सरावासाठी सर्व सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत केवळ करोनाबाबत निर्माण झालेली परिस्थिती पाहिल्यानंतरच त्यांना येथे सरावाची परवानगी देण्याचा निर्णय घेतला जाईल. एकत्र किंवा सांघिक पातळीवर पुढील काही महिने तरी सरावाची परवानगी दिली जाणार नाही, असेही रिजीजू यांनी सांगितले.