ठाकुरसाई – मावळ आणि पिंपरी-चिंचवडची तहान भागविण्यासाठी 50 वर्षांपूर्वी पवना धरण उभारण्यात आले. परंतु हे धरण उभारत असताना येथील ठाकुरसाई गाव पाण्यात बुडाले. अनेक वर्षांनंतर पवना धरणातील पाणीसाठा 17 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पाणी उतरताच गावातील जुन्या मंदिरांचे अनेक वर्षांनी नागरिकांनी दर्शन घडले. कधी या ठिकाणी आपले आई-वडील राहत होते, तर काहींचे बालपण येथेच गेले. त्या गतस्मृतींना मंदिर व इतर अवशेषांना उजाळा देत अनेकांच्या नेत्रकडा पाणावल्या.
पवना धरण उभारताना भूसंपादन करण्यात आलेल्या गावांपैकी ठाकूरसाई हे एक गाव आहे. या छोट्या गावाला पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जलसमाधी मिळाली. पवना धरणात पाणी साठू लागल्याने गावठाणातील मंदिर, शाळा, पीठगिरणी व घरे या पाण्याने आपल्यात सामवून घेतले. त्यानंतर काही नागरिकांनी काठावर राहणे पसंत केले तर काही नागरिक कामाच्या निमित्ताने गाव सोडले.धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने अनेक वर्षांपासून पाण्यात लपलेले हे बांधकाम अजूनही आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देत आहे. मंदिरातील मूर्ती स्पष्ट दिसत आहे. या गावात अनेकांची बालपण गेले होते. पाण्याच्या गर्भात हरवलेले आपले गाव किनाऱ्यावर उभे राहून पाहत अनेक ज्येष्ठ नागरिकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.
1972 सालापासून पाणीसाठा साठवण करण्यास सुरुवात झाली. पाहता-पाहता संपूर्ण गाव पाण्यात सामावून गेले, परंतु अजूनही खोल पाण्याखाली आपले अस्तित्व टिकवून आहे. पडझड झालेली बांधकामे, मंदिराचे अवशेष, मूर्ती इतिहासाची साक्ष बनून आज पाण्याबाहेर डोकावत आहेत. पावसाळा सुरू झाला आहे. पुन्हा दऱ्या-खोऱ्यातून येणारे पाणी या अवेशषांना आपल्या कवेत घेईल. त्यामुळे सध्या नागरिकांची याठिकाणी गर्दी होत आहे.
अजूनही 863खातेदार वंचितच
शासकीय आकडेवारीनुसार 1203 खातेदार प्रकल्पामध्ये बाधित झाले आहेत. 340 खातेदारांना प्रत्येकी 4 एकर जमीन देऊन शासनाने पुनर्वसन केले आहे. उर्वरित खातेदार पुनर्वसनाचे प्रतीक्षेत आहेत. युती शासनाच्या काळात 1995 ते 1999 दरम्यान संपादित केलेल्या जमिनीपैकी 328 एकर जमीन पुनः अनुदानित केली आहे. या ठिकाणी धनदांडग्यांनी बंगले बांधले आहेत.