नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने मोचा चक्रीवादळ निर्माण झाले आहे. या चक्रीवादळाचा वेग वाढला असून आता २०० किमी प्रति तास वेगाने बांगलादेश-म्यानमारच्या समुद्रकिनाऱ्यावर ते धडकले आहे. त्यामुळे बांगलादेश-म्यानमारच्या सीमावर्ती भागात मुळधार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी किनारपट्टीजवळ जाऊ नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या वृत्तानुसार, या चक्रीवादळाचा बांगलादेशच्या दक्षिण-पूर्व भागातील जिल्ह्यांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कॉक्स बाजार परिसरातून एक लाख ९० हजार लोकांना, तर चितगावमधून एक लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात रोहिंग्या नागरिक राहत असल्याची माहिती स्थानिक विभागीय आयुक्त अमिनुर रहमान यांनी दिली आहे.
बांग्लादेशप्रमाणे म्यानमारमधील राखीन भागातील १० हजार नागरिकांनाही सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे सुरु असलेल्या विश्व खाद्य कार्यक्रमांतर्गत येथील नागरिकांनी अन्न आणि इतर मदत दिली जात आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा परिणाम ईशान्य-पूर्व भारतातील काही भागांवरही होण्याची शक्यता आहे.
आज नागालँड, मणिपूर आणि दक्षिण आसाममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफच्या आठ टीम पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. तर, एनडीआरएफचे २०० बचावकर्ते कार्यरत असून १०० बचावकर्ते राखीव ठेवण्यात आले आहेत.