मुंबई – कर्नाटकमध्ये कॉँग्रेसने भाजपचा दारुण पराभव केला आहे. सर्व कॉँग्रेस नेत्यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यानंतर आता पहिल्यांदाच कर्नाटकातील कॉँग्रेसच्या विजयाबद्दल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे या विजयाबद्दल राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. कर्नाटकातील हा विजय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम असल्याची प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांनी भाजपवर टीका करत कॉँग्रेसचे कौतुक केले आहे. राज ठाकरे म्हणाले की, “विरोधी पक्ष कधी जिंकत नाही सत्ताधारी हरत असतात. पराभव हा स्वभावाचा पराभव आहे. आपलं कोणीच वाकड करू शकत नाही असं मानणाऱ्यांचा हा पराभव आहे. लोकांना कधीही गृहीत धरू नये, या निकालांमधून सगळ्यांनी बोध घेण्यासारखा आहे. कर्नाटकातील हा विजय राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा परिणाम आहे.”
कर्नाटक निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? असा प्रश्न राज ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर “कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून महाराष्ट्रातील निकालाबाबत लगेच सांगता येणार नाही,” असे उत्तर त्यांनी दिले.
दरम्यान, कर्नाटक विधानसभेच्या 224 पैकी 135 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यामुळे अर्थातच काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला आहे. तर दुसरीकडे भाजपला केवळ 65 जागा जिंकता आल्या आहेत. जेडीएसला देखील यावेळी चांगली कामगिरी करता आली नाही. जेडीएसने केवळ 19 जागा जिंकल्या. तर बेळगाव जिल्ह्यातील 18 पैकी 11 जागी काँग्रेसने विजय मिळवला तर 7 जागा भाजपने जिंकल्या. येथील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व उमेदवारांचा पराभव झाला.