- नऊ दिवस व्यवहार बंद
- पुन्हा एकदा आर्थिक झळ
पिंपरी – करोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी आळंदीतील कार्तिकीवारीनिमित्त वारकऱ्यांनी एकत्र जमा होऊ नये, याकरिता संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सहा सात महिन्यांच्या लॉकडाऊननंतर दैनंदिन व्यवहार सुरळीत होत असतानाच, पुन्हा एकदा नऊ दिवस व्यवहार बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यावसायिकांना पुन्हा आर्थिक फटका बसला आहे. आळंदीलगतच्या व्यावसायिकांना या संचारबंदीची झळ बसत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 724 व्या संजीवन समाधी सोहळ्याला रविवारपासून (दि.6) सुरुवात झाली आहे. येत्या 14 डिसेंबरपर्यंत सोहळा सुरु राहणार आहे. या सोहळ्यात राज्य-परराज्यातील चार ते पाच लाख भाविक सहभागी होत असतात. मात्र यंदा करोनाचा धोका असल्याने आळंदी व परिसरातील गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दिवसेंदिवस निर्बंध कठोर केले जात आहेत. याकालावधीत दैनंदिन व्यवहारावर निर्बंध लादण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवावगळता अन्य व व्यवहार करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे औषधविक्री दुकाने, किराणा,भाजीपाला व दवाखाने,रुग्णालये व अत्यावश्यक सेवा सुरु आहेत.
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी 4 डिसेंबरला आदेश काढत संचारबंदी लागू केली आहे. त्यानुसार आळंदी व लगतच्या गावांना हा आदेश लागू करण्यात आला आहे. यामध्ये केळगाव, चऱ्होली खर्द, चऱ्होली बुद्रुक, चिंबळी, वडगाव घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळू, मरकळ व डुडळगाव या गावांचा समावेश आहे. यापैकी चऱ्होली बुद्रुक व डुडळगाव ही दोन्ही गावे पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील असल्याने शहराच्या अन्य भागात दैनंदिन व्यवहार सुरु असताना या गावांमधील व्यवहारांवर मात्र निर्बंध आहेत.
सात महिन्यांच्या लॉकडाऊननंतर अनेकांनी व्यवसाय बंद केले आहेत. आता कुठे जनजीवन पूर्वपदावर येत असताना पुन्हा नऊ दिवसांच्या संचारबंदीमुळे व्यावसायिकांच्या अडचणींमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.