मुंबई – अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत असतानाच मागणी वाढल्यामुळे देशात कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. औष्णिक वीज केंद्राकडे फक्त चार दिवस पुरेल एवढा कोळशाचा साठा आहे. या आघाडीवर काही वेगवान घडलेल्या घडामोडी घडल्या नाहीत तर आगामी काळात विजेच्या टंचाईचे संकट निर्माण होऊ शकते.
अगोदरच कोळशाची टंचाई असल्यामुळे पोलाद आणि ऍल्युमिनियम कारखान्याना दिला जाणार असणारा कोळसा कमी करून तो वीज निर्मिती केंद्राकडे वळविण्यात येत आहे. विजेची टंचाई निर्माण झाल्यानंतर विजेचे दर वाढू शकतात असा इशारा देण्यात येऊन आला आहे.
चीनमध्येही असाच प्रकार गेल्या महिन्यात झाल्यामुळे त्या ठिकाणी वीज टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन औद्योगिक उत्पादनावर परिणाम झाला होता. भारतात गरजेच्या 75 टक्के वीज उत्पादन देशातील कोळशापासून निर्माण होते. मात्र गेल्या काही महिन्यापासून कोळसा उत्पादन करणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे कोळशाच्या उत्पादनावर आणि वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
दरम्यानच्या काळामध्ये आयात आघाडीवरही परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. कोळशाचा पुरवठा कमी झाल्यामुळे कोळसा चढ्या भावाने वीज निर्माण करणाऱ्या कंपन्यांना घ्याव्या लागत आहे. त्यामुळे वीज उत्पादन खर्च वाढणार आहे. जागतिक बाजारात कोळश्याचे दर जास्त झाले असतानाच देशातील कोळशाचा पुरवठयावर परिणाम झाल्यामुळे हा पेचप्रसंग निर्माण झाला असल्याचे सांगितले जाते.
एकूण परिस्थिती पाहता आगामी काळामध्ये ग्राहकांना विजेसाठी जास्त पैसे मोजावे लागणार असल्याचे आता स्पष्ट होऊ लागले आहे. यासाठी आवश्यक त्या परवानग्या वीज निर्माण करणाऱ्या कंपन्या आणि वितरण करणाऱ्या कंपन्या ऊर्जा नियंत्रकाकडे मागण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या अखेरीस मिळालेल्या माहितीनुसार देशातील ऊर्जा निर्माण करणाऱ्या कंपन्याकडे फक्त 81 लाख एवढा कोळसा आहे.
हा कोळसा चार दिवसाच्या वीजनिर्मितीसाठी पुरतो. जर विजेचे दर आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढले तर त्याचा औद्योगिक उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. असे झाले तर याचा विकास दरालाही फटका बसू शकतो. धनबाद येथील कोळसा खाणीत मोठ्या प्रमाणात कोळसा निर्माण होतो. मात्र त्या ठिकाणी प्रदीर्घकाळ पाऊस चालू आहे. त्यामुळे दिवसाला 60 ते 80 हजार टन कोळश्याची तूट निर्माण होत असल्याचे कोळसा सचिव अनिल कुमार जैन यांनी सांगितले.