संगमनेर, (प्रतिनिधी) – संगमनेरच्या अवैध कत्तलखान्यांवर नगरच्या गुन्हे शाखेने पुन्हा एकदा छापा टाकल्याने बिनबोभाटपणे सुरू असलेले हे कत्तलखाने स्थानिक पोलिसांना दिसत कसे नाही.? असा प्रश्न नगरच्या गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईने उपस्थित होत आहे. काल संध्याकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत तब्बल 850 किलो गोमांससह एक लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असल्याने स्थानिक प्रशासनावर शंका उपस्थित होत आहेत.
अनिस गुलाम हैदर कुरेशी यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ही कारवाई संध्याकाळी 6.30 वाजता गल्ली नंबर 2 भारतनगर येथे एका निळ्या रंगाच्या पत्र्याच्या गेटच्या आतील घरामध्ये सुरू होती. विशेष म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांचे पथक असूनही त्यांचे याकडे दुर्लक्ष होत असून त्यांना याकडे कानाडोळा केल्याचे उघडपणे जाणवू लागले आहे.
आजवर शेकडो कारवाया करून देखील संगमनेरचे अवैध कत्तलखाने काही केल्या बंद होत नसल्याचे अधोरेखित होत आहे. गोवंश जनावरांची हत्या व गोमांस विक्री कायद्याने गुन्हा आहे, परंतु या कायद्याला संगमनेरमध्ये सपशेल केराची टोपली दाखविण्यात येते. नगरच्या गुन्हे शाखेचे पथक संगमनेरमध्ये येऊन कत्तलखान्यांवर छापा टाकल्याने स्थानिक पोलिसांचा अकार्यक्षमपणा चव्हाट्यावर आला आहे.
मोठ्या कसायांना स्थानिक प्रशासनाने हात डोक्यावर ठेवल्याने त्याला नेहमीच अभय मिळाले. त्यामुळे नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेला संगमनेरमध्ये यावे लागते आणि तालुक्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करावी लागते. विशेष म्हणजे ज्या कसायांवर कारवाया झाल्या, त्याला तडीपार केले होते. त्याच्यामुळे संगमनेर तालुक्यात कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला होता.
तो कसाई नेहमीच संगमनेर शहर पोलीस ठाण्यात येऊन कर्मचाऱ्यांच्या भेटीगाठी घेत असल्याने शहर पोलीस ठाणे पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.