नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय फुटबॉलला स्पर्धा म्हणून आज विविध देशांतील फुटबॉल लीगचा आपण उल्लेख करतो. टी-20 क्रिकेटमुळे जागतिक क्रिकेटही फुटबॉलच्याच वाटेवर प्रवास करत आहे, असा धोका भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू व समालोचक रवी शास्त्री यांनी व्यक्त केला आहे.
येत्या काळात आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंप्रमाणे क्रिकेटपटूदेखील जागतिक लीग टी-20 क्रिकेटलाच प्राधान्य देताना दिसतील. जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा कार्यक्रम असेल तेव्हा ते आपापल्या देशाकडून खेळतील, परंतू अन्य वेळ अशा लीगसाठीच देतील. अशा टी-20 लीग क्रिकेटचा खरेतर जागतिक क्रिकेटपेक्षा द्विपक्षीय मालिकांनाच जास्त फटका बसणार आहे.
प्रत्येक देशाचे क्रिकेट मंडळ आपल्या खेळाडूंशी दीर्घ मुदतीचे करार करत असते. मात्र, गेल्या काही काळात न्यूझीलंडच्या काही क्रिकेटपटूंनी असे करार नाकारले आहेत. त्याचाच कित्ता अन्य देशांचे क्रिकेटपटूही गिरवतील. कारण अशा लीगमध्ये खूप कमी दिवसांत जास्त पैसा मिळतो, त्यामुळे त्याकडे जास्तीत जास्त खेळाडू आकर्षित होताना दिसतील, असेही शास्त्री म्हणाले.
कसोटी सामन्यांत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न कधीकाळी खेळाडू पाहायचे. आम्हीही हेच स्वप्न घेऊन मेहनत केली. सध्याच्या काळात देशापेक्षा आयपीएल किंवा अशाच लीग क्रिकेटमध्ये स्वप्न पाहणारे खेळाडू समोर येत आहेत. हाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी मोठा धोका ठरणार आहे, असेही शास्त्री यांनी सांगितले.
एकदिवसीय क्रिकेटला जास्त धोका
टी-20 क्रिकेटचाच इतका मोठा भडीमार सुरू आहे, त्यामुळे एकदिवसीय सामन्यांची सख्याही रोडावली आहे. आयपीएलसारख्या विविध देशांतील टी-20 लीगची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्यामुळे सर्वात जास्त धोका एकदिवसीय क्रिकेटलाच बसणार आहे. मुळातच खेळाडूंचाच नव्हे तर प्रेक्षकांचाही एकदिवसीय क्रिकेटचे सामने पाहण्यातील रस कमी होत आहे, असेही शास्त्री यांनी म्हटले आहे.