– अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सने सुरुवातीपासूनच्या अपयशाची मालिका अद्याप खंडित केलेली नाही. स्पर्धेच्या इतिहासात तब्बल पाच वेळा विजेतेपद मिळवणारा हा संघ यंदा मात्र यशाची प्रतीक्षा करत आहे. त्यातच संघातील नवोदितांना सातत्याने संधी देण्यापेक्षा सोकॉल्ड स्टार्सलाच खेळवले जात आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला अद्याप पदार्पणाची संधीही देण्यात आलेली नाही. केवळ तो सचिनचा मुलगा आहे म्हणून संधी द्या असे नाही तर त्यानेही रणजी करंडक, तसेच अन्य प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली आहे म्हणून संधी द्या असे वाटते.
मुंबईच्या रणजी संघात असेच घडत होते, त्याला संभाव्य खेळाडूंत तसेच 16 खेळाडूंच्या संघात निवडले जात होते. मात्र, प्रत्यक्षात सामन्यात खेळवण्याची संधीच दिली गेली नाही. खूप वाट पाहिल्यावर अखेर सचिनने त्याला गोवा संघाकडून रणजी खेळण्याचे सुचवले व पहिल्याच मोसमात त्याला रणजी करंडकात पदार्पणही करता आले. सचिनने वशिला लावला असे म्हणायला भरपूर वाव आहे, कारण सचिनचा मुलगा असल्याने वावड्या उडवायला आपल्या देशात अनेक जाणकार बसलेले आहेत.
मात्र, अर्जुनने खरोखरच आपली गुणवत्ता दाखवून दिली. आता तो आयपीएल स्पर्धेत पदार्पण करण्याच्या प्रतीक्षेत आहे. कारण रणजी करंडक किंवा देशांतर्गत स्पर्धा जरी तो गोवाकडून खेळणार असला तरीही आयपीएल स्पर्धेत त्याला मुंबई इंडियन्सनेच घेतलेले असल्याने त्यांच्याचकडून संधी मिळेल, पण कधी हा प्रश्न अद्याप कायम आहे. जर त्याला सातत्याने राखीव म्हणून किंवा बेंचवरच बसवायचे आहे तर त्याला संघात घेतलेच कशासाठी.
तो सचिनचा मुलगा आहे म्हणून त्याला वेगळा न्याय लावा असे अजिबात नाही, पण त्याला सामन्यात खेळवा तरी, म्हणजे कळेल तो कशी कामगिरी करतो. त्यात सातत्य राखतो का किंवा क्षमतेचा पूर्ण वापर करतो का? या सगळ्या गोष्टी तपासून पाहा व जर तो या निकषात बसतच नसेल तर खुशाल संघाबाहेर काढा.
हातात पाण्याच्या बाटल्या व खांद्यावर टॉवेल किंवा एक भारत दर्शनासाठी आलेला पर्यटक म्हणून त्याला संघात ठेवण्यापेक्षा पुढील मोसमास रिलीज करा म्हणजे या स्पर्धेतील दहा संघात जो खरा रत्नपारखी असेल तो त्याच्यासाठी बोली लावेल व आपल्या संघात घेऊन त्याला पुरेशी संधी देईल. वारंवार बेंचवर बसवण्यापेक्षा ते जास्त योग्य ठरेल.