एसीसी इमर्जिंग आशिया करंडक स्पर्धा सध्या सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय उपखंडातीलच सगळे संघ खेळत आहेत. मुळातच या स्पर्धेचे आयोजन कशासाठी करण्यात येत आहे त्यामागचा उद्देश समजून घेतला तर प्रत्येक देशाला नवोदित खेळाडूंचा संच मिळावा, हा आहे. पण बीसीसीआय या स्पर्धेबाबत तसेच यातून पुढे येत असलेल्या खेळाडूंबाबत किती गंभीर आहे ते महत्त्वाचे आहे.
मुळात सध्याच्या भारतीय संघातील अंतिम अकरा खेळाडूंनाच प्रत्येक जागेसाठी पर्याय आहेत. त्यांनाच संधी मिळत नसल्याचे चित्र आहे. मग या इमर्जिंग स्पर्धेतून पुढे येत असलेल्या खेळाडूंचे भवितव्य काय असेल, असा प्रश्न निर्माण होतो.
दुसरीकडे निवड समितीचे नवनियुक्त अध्यक्ष व भारताचे माजी कसोटी क्रिकेटपटू अजित आगरकर असे 20 खेळाडू तयार किंवा निश्चित करत आहेत, की ज्यांना आगामी काळातील मोठ्या स्पर्धांमध्ये खेळवले जाणार आहे. त्यातही जुन्या खेळाडूंना म्हणजेच डोईजड ठरत असलेल्या काही खेळाडूंना तुमचा आता संघ निवडीसाठी विचार केला जाणार नाही, असे स्पष्ट संकेतही देण्यात आले आहेत. त्यात शिखऱ धवनसारखाही खेळाडू आहे. भुवनेश्वर कुमारबाबतही तेच घडले आहे.
आता या इमर्जिंग स्पर्धेतून राजवर्धन हंगरगेकर, साई सुदर्शन, अभिषेक शर्मा, निशांत संधू, ध्रुव जुरेलहर्षित राणा व निशित रेड्डीसारखे खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. बुधवारीच या स्पर्धेत भारतीय संघाने पाकिस्तानचा 8 गडी राखून पराभव केला. त्यात हंगरगेकरने 5 गडी बाद करत विजयात मोलाचा वाटा उचलला. आता त्याला भारताच्या प्रमुख संघात येण्यासाठी किती काळ वाट पाहावी लागणार आहे हे माहिती नाही.
या सगळ्या खेळाडूंनी केवळ अशाच स्पर्धांमध्ये सरस कामगिरी करायची व निवड समिती कोणत्या तरी भुक्कड संघाविरुद्धच्या मालिकेत एकदाच संधी देणार व बाकीचा काळ हे खेळाडू आयपीएल स्पर्धेतील कामगिरीवर व त्यातून मिळत असलेल्या पैशांवरच खूश राहणार. हे भारतीय क्रिकेट नव्हे, खरे तर हे क्रिकेटच नव्हे. कारण गुणवत्तेला योग्य वेळी न्याय मिळाला तरच ती खुलेल हे बीसीसीआयला कधी समजणार.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला सोळाव्या वर्षी संधी मिळाली. प्रत्येक खेळाडू सचिन होणार नाही, हे मान्य. पण, मग अशा कितीतरी होऊ घातलेल्या सचिनकडे आणखी किती काळ काणाडोळा केला जाणार. म्हणूनच प्रश्न निर्माण होतो की, इमर्जिंग स्पर्धेसारख्या स्पर्धांचा खरेच किती उपयोग होणार आहे.