राहुरी – जलजीवन मिशन अंतर्गत वांबोरी पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच आहे असे गौरवोद्गार खा. डॉ. सुजय विखे यांनी काढले. वांबोरी चारीच्या 40 कोटी 64 लाख रुपयांच्या भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. शिवाजी कर्डिले होते. या वेळी व्यासपीठावर विकास मंडळाचे तालुकाध्यक्ष चाचा तनपुरे, उत्तमराव म्हसे, सूरसिंगराव पवार, श्यामराव निमसे, खेमा पाटील, शिवाजी गाडे, भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब गागरे, माजी अध्यक्ष विक्रम तांबे आदी उपस्थित होते.
खा. विखे म्हणाले की, या तालुक्यातील जनतेचे व विखे कुटुंबीयांचे खूप जुने ऋणानुबंध आहेत. या तालुक्याचा विकास करणे हे विखे कुटुंबीयांचे पूर्वीपासून ध्येय आहे. परंतु राहुरीच्या वाड्यातील विघ्नसंतोषी लोक ज्यांना या तालुक्याचा आम्ही केलेला विकास देखवत नाही असा टोला तनपुरे यांचे नाव न घेता त्यांनी लगावला. राहुरी कारखाना ही या तालुक्याची कामधेनू आहे. तो वाचवण्याचा आम्ही पूर्वीपासून प्रयत्न केलेला आहे. स्व. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार टिकवण्यासाठी वेळप्रसंगी जीवाचे रान केले, परंतु कधीही हार मानली नाही. सुजय विखे हे रसायन तसेच आहे; पण थोडं वेगळं आहे. मीदेखील राहुरी तालुक्याची कामधेनू वाचवण्यासाठी वेळप्रसंगी आमरण उपोषण करेल; परंतु हा कारखाना कोणा आयऱ्या-गयऱ्याच्या ताब्यात जाऊ देणार नाही.
वेळप्रसंगी मी माझी खासदारकी पणाला लावेन, असेही ते म्हणाले. माजी आ. कर्डिले म्हणाले की, मी तालुक्याचा आमदार असताना दुजाभाव केला नाही. शेतकरी, सभासद, कामगार यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न असलेल्या राहुरी कारखान्याची कामधेनू वाचवण्यासाठी पाहिजे तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये कुठलेही राजकारण केले नाही. परंतु तनपुरे कुटुंबीयांनी पत्रकबाजी करून फक्त आणि फक्त राजकारण केले, अशी टीका त्यांनी या वेळी केली. या वेळी सुभाष पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. वांबोरी चारिच्या कामासाठी प्रामाणिकपणे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. श्यामराव पटारे यांनी आभार मानले.