शंकर ढेबे/ वेल्हे:कोरोना या जागतीक माहामारीमुळे काही वाईट तर काही सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत. वेल्हे तालुका कृषी प्रधान तालुका आहे. तालुक्यात ८० ते ९० टक्के शेती केली जात होती. परंतू आलीकडचे आधुनिक युगामुळे तालुक्यातील तरूण वर्गाने शेतीकडे पाठ फिरवली होती.
तरूण वर्गाला पालक शेतात मदत करण्यास सांगूनही तरूण वर्ग शेतीकडे दुर्लक्ष करू लागला होता. शेतीत काय आहे एवढं त्यापेक्षा माझं काम बरं हे तरूण मंडळींचं उत्तर असायचे. शेतात कष्ट नको की उन्हाचा चटका नको त्यापेक्षा ऑफिसाचा एसी बरा म्हणारी मंडळी आता शेतात राबताना दिसत आहे. आपल्या आई वडीलांच्या खांद्याला खांदा लावून शेतीची मशागत करत आहेत. जी शेती होती ती अधिक करण्याकडे तरूण मंडळीचा कल गेलेला आहे. एरवी कपडे खराब होतील. कपड्यावरची इस्त्री उडेल म्हणणारी मंडळी शेतीत काम करून कोरोनाशी लढा देत आहेत.
वेल्ह्यात एकही उद्योग धंदा नाही. तीन-तीन धरणाने वेढलेला वेल्हा औद्योगिकीकरणापासून चार हात लांबच राहीला आहे. निवडणूका आल्या की राजकारण्यांचे राजकारण चालते. त्यामुळे विकासाला खिळ बसलेल्या तालुक्याला शेती हा एकमेव पर्याय बनला आहे.
तालुक्यातील तरूण वर्ग पुणे येथील मार्केट यार्डला मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. तर काही तरुण छोटे मोठे उद्योग धंदा पुणे- मुंबईला येवून करत होते. करोना भारतात आला आणि शासनाने लॉकडाऊन घोशीत केले.अन सर्व कामधंदे ठप्प झाले. हाताला काम नाही. त्यामुळे जगणं अवघड होवून बसलं. जगावं कसं तर मग गावंकडे जावं आणि ओस पडलेली शेतीला पुन्हा उभारी द्यावी म्हणून हे सर्व तरूण मंडळींनी आपल्या गावाकडची वाट धरली.
गावाकडे तरूण मंडळी आले खरे पण खायचे काय हा प्रश्न भेडसावू लागला. पुढे भविष्यात अशी वेळ येवू नये म्हणून आपली शेती कधीही बरी म्हणत हातात बैल नांगर घेवून शेताला सुरूवात तर या मंडळींनी केली. आणि ओस पडलेल्या शेतात न दिसलेला तरुण दिसू लागला.