पुणे – देशातील राहण्यायोग्य शहर, स्वच्छतेत देशातील पहिल्या दहा क्रमांकामधील शहर, स्मार्ट सिटी अशी बिरूदावली मिरवित मोठेपणा दाखविणाऱ्या महापालिकेस शहरातील झोपडपट्टीमधील नागरिकांना साधे पिण्याचे पाणीही देता येत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
पाटील इस्टेट गल्ली नं- 10 पिण्याच्या एक जलवाहीनी गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून चक्क नाल्यात फुटली असून या जलवाहीनीला सायकलच्या टायरच्या आतील ट्यूब ने दुरूस्त करून नागरिकांना पिण्याचे पाणी दिले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या जलवाहीन्या चक्क नाल्यातून टाकण्यात आल्या असून त्यातून येणारे पाणी किती चांगले असेल हे न बोललेच बरे….
गेल्या दोन महिन्यांपासून ही जलवाहीनी फुटली आहे. धक्कादायक म्हणजे जी जलवाहीनी नाल्यातून जाते तसेच त्यावर मोठया प्रमाणात नाल्यातील कचराही अडकतो. त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी महापालिकेच्या चतुःश्रुंगी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती.
त्यानंतर महापालिकेचे अधिकारी येथे येऊन पाहून गेले आहेत पण महिना झाला सदर अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले असल्याने नागारिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीनं या जलवाहीनीची दुरूस्ती करावी अशी मागणी मनसे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास निम्हण, शिवाजीनगर उपविभाग अध्यक्ष गोकुळ अडागळे यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे चतुःश्रुंगी पाणी पुरवठा विभागाकडे केली आहे.