मुंबई – देशातील सर्वोच्च सरकारी नोकरी म्हणून आयएएसची नोकरी मानली जाते. खडतर परिश्रम केल्यानंतर आयएएस होण्याचा मान मिळतो. लाखो तरुण आयएएस होण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र त्यापैकी काही निवडकच तरुणांना यश येते. अस असताना मराठमोळे आयएएस अधिकारी वैभव वाघमारे यांनी आपला धारणीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिला.
वैभव वाघमारे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे आपला राजीनामा पाठवला आहे. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर पोस्ट पोस्ट शेअर करून ही माहिती दिली. त्यांच्या राजीनाम्याने आश्चर्य व्यक्त कऱण्यात येत आहे.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये वैभव वाघमारे म्हणाले की, काल देशाच्या सर्वोत्कृष्ट नोकरीचा (IAS) राजीनामा दिला. जीवनात काहीतरी आणखी चांगले व उदात्त करण्याच्या शोधापोटी हे केले. निर्णय घेणे थोडेसे कठीण होते. या धाडसामागे कारण आणि प्रेरणा असलेल्या तथागतांचे आभार.
IAS, ( IRS, आणि IRAS) चे आभार, ज्याने फक्त तीन वर्षांत जीवनाचा इतका समृद्ध अनुभव दिला, जो अनुभव मिळण्यासाठी सामान्य आयुष्याचा साधारणपणे 20-30 वर्षांचा कालावधी लागला असता .
वैभव पुढे म्हणतात, आयएएस ही देशातील सर्वोत्तम सरकारी नोकरी असल्याचं मानलं जात. मला तर वाटत ही जगातील सर्वोत्तम सरकारी नोकरी आहे. पण जगात जे सर्वोत्कृष्ट समजले जाते ते एखाद्याला आवडलेच पाहिजे, आणि त्याने ते आयुष्यभर केले पाहिजे हे आवश्यक आहे का?, असा प्रश्नही वैभव यांनी उपस्थित केला.
भारतीय प्रशासकीय सेवा, व सेवेत कार्यरत असलेले चांगले अधिकारी, ज्याना भेटण्याचा व ज्यांच्यासोबत काम करण्याचा योग आला त्याचे आभार. तथापि, मला आशा आहे की हा राजीनामा लवकरात लवकर स्वीकारला जाईल आणि माझ्यावर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीतून मला मुक्त केले जाईल, अस वैभव यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.