पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – डू नॉट डिस्टर्बची (डीएनडी) सेवा सुरू असतानाही वारंवार अनावश्यक फोन येऊन ग्राहकांना त्रास होत असतो. मात्र, आता या त्रासातून ग्राहकांची सुटका होणार आहे. याबाबत अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यामध्ये एका प्रकरणात दूरसंचार कंपनीने अनावश्यक फोन येऊन त्रस्त झालेल्या ग्राहकाला २५ हजार रुपये नुकसान भरपाई आणि ५ हजार रुपयांचा तक्रार खर्च द्यावा, असे आदेश दिले आहेत.
जिओ नेटवर्क आणि वोडाफोन नेटवर्क या दोन कंपन्यांना आयोगाचे अध्यक्ष जयंत देशमुख, सदस्या शुभांगी दुनाखे आणि प्रणाली सावंत यांनी हे आदेश दिले आहेत. याबाबत मनजितसिंग बावरी यांनी जिओ, वोडाफोन, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (टीआरएआय) आणि लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्या विरोधात ॲड. स्वप्नील भालेराव यांच्यामार्फत तक्रार केली होती.
तक्रारदारांनी जिओ व वोडाफोन नेटवर्कला नोटीस पाठवली होती. मात्र, दोघांनीही नोटिशीला उत्तर दिले नाही. तक्रारदारांनी डीएनडीची सेवा सुरू केल्यानंतरही त्यांना सातत्याने अनावश्यक कॉल येत राहिले, ही बाब सिद्ध होते. मार्केटिंगचे फोन येत राहणे आणि तक्रार केल्यानंतर तिचे निवारण न करणे ही बाब सेवेत दोष निर्माण करते, असा निष्कर्ष आयोगाने काढला आहे.
इतर नेटवर्कचे कॉल नाकारणे शक्य नाही; जिओ
आयोगाची नोटीस मिळाल्यानंतर जिओने त्यांचे म्हणणे दिले होते. ग्राहकाला नको असलेले फोन जिओ नाही, तर एअरटेल नेटवर्कमधून आले आहेत. डीएनडी सुरू केल्यानंतर फक्त आपल्या स्वतःच्या नेटवर्कमधून येणारे फोन नाकारणे आमच्यावर बंधनकारक आहे.
अन्य नेटवर्कमधून येणारे कॉल्स आम्हाला नाकारता येणे शक्य नाही, असे जिओने लेखी जबाबात नमूद केले आहे. तक्रारदार यांना इतर नेटवर्कमधून आलेले फोन थांबविण्याची जबाबदारी आपली नसल्याची जिओची भूमिका मान्य करणे शक्य नसल्याचे मत आयोगाने नोंदवले.
टीआरएआयकडे तक्रार दाखल करणे अपेक्षित; वोडाफोन
तक्रारदार यांनी केलेल्या सर्व तक्रारी वोडाफोनने नाकारल्या. तक्रारदार यांनी डीएनडी सेवा सुरू केल्यानंतर फक्त एकदाच अशा प्रकारचा मार्केटिंगचा फोन आला होता. नियमाप्रमाणे अशा प्रकारचा फोन आल्यास तक्रारदार यांनी ‘टीआरएआय’कडे तक्रार करणे अपेक्षित आहे. तक्रारदार यांची तक्रार मिळाल्यानंतर याबाबात ‘टीआरएआय’ला कळवले होते, असा जबाब वोडाफोनने दाखल केला होता.
डीएनडी सेवा सुरू असताना टेलिमार्केटिंगसारखे अनावश्यक व मानसिक त्रास देणारे कॉल्स आले, तर त्याविरोधात तक्रार करण्याचा अधिकार टीआरएआयच्या नियमांनुसार ग्राहकाला आहे. असे अनेक ग्राहक आहेत, जे असंख्य टेलिमार्केटिंग फोनने त्रासलेले आहेत. त्यांच्यासाठी हा निकाल महत्त्वाचा ठरणार आहे. ॲड. स्वप्नील भालेराव, तक्रारदार ग्राहकाचे वकील