नवी दिल्ली: करोनाच्या लॉकडाऊन मुळे देशाच्या विविध भागात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांचे रेल्वे भाडे कॉंग्रेस पक्ष भरेल अशी महत्त्वाची घोषणा कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. अत्यंत हालाकिच्या स्थितीत असलेल्या या मजुरांकडून सरकार जादा दराने रेल्वे भाडे वसूल करीत असल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली असून हे सरकार मजुरांच्या बाबतीत असंवेदनशील असल्याची टीकाहीं त्यांनी केली आहे.
या संबंधात सोनिया गांधी यांनी जे निवेदन प्रसिद्धीला दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की, केवळ चार तासांचा अवधी देऊन देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला त्यामुळे अनेक मजूर ठिकठिकाणी अडकून पडले. 1947 च्या फाळणीनंतर प्रथमच देशाने पायी गावाकडे परत जाणारे गरीब लोकांचे तांडे पाहिले. आणि त्या वेळच्या भीषण परिस्थितीचा पुन्हा अनुभव देशाने घेतला. या मजुरांकडे ना अन्न, ना पैसा, ना औषधे आणि ना साधने अशी स्थिती आहे. तरीही धीराने ही मंडळी घरचा रस्ता कापत असताना पाहून त्यांच्यातील धैर्याचीही प्रचिती आली आहे. अशा अत्यंत हालाकीच्या स्थितीत असलेल्या मजुरांकडून केंद्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय प्रवासी भाडे वसूल करीत आहे. हे श्रमिक आणि कामगार राष्ट्राचे विकास दूत आहेत.
जर आपण विदेशात अडकलेल्या लोकांना विमानाने मोफत मायदेशी आणू शकतो आणि गुजरात मधील केवळ एका कार्यक्रमासाठी आपण शंभर कोटी रुपये खर्च करू शकतो तर देशाच्या विकासात योगदान देणाऱ्या या दुतांच्या मोफत रेल्वे प्रवासाची सोय आपण का करू शकत नाही असा सवाल सोनिया गांधी यांनी निवेदनात केला आहे. ही मागणी कॉंग्रेसने सरकारकडे वारंवार केली आहे पण सरकारने त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता कॉंग्रेस पक्षानेच या मजुरांच्या रेल्वे भाड्याचा खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे असेहीं त्यांनी म्हटले आहे. या मेहनती व कष्टकरी वर्गाच्या बरोबर खांद्याला खांदा लाऊन उभे राहण्यासाठी कॉंग्रेस पक्षाचे हे योगदान असेल असेही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.