नवी दिल्ली – बिहार विधानसभेतील शक्तिपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने त्या राज्यातील आमदारांना हैदराबादला हलवले आहे. त्यावरून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूने कॉंग्रेसची खिल्ली उडवली. त्यावर कॉंग्रेसने सभोवती चोर असताना काळजी घ्यायला हवी, असे उपरोधिक उत्तर दिले.
नितीश यांनी महाआघाडीची साथ सोडत पुन्हा भाजपशी मैत्री केली. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएचे सरकार स्थापन झाले. ते सरकार बहुमत सिद्ध करण्यासाठी लवकरच विधानसभेतील शक्तिपरीक्षेला सामोरे जाणार आहे. त्यामुळे आपले आमदार फुटू नये याची दक्षता राजद, कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांची महाआघाडी घेत आहे.
कॉंग्रेसने आपल्या आमदारांना स्वत:ची सत्ता असणाऱ्या तेलंगणात हलवले आहे. ते आमदार हैदराबादजवळ असणाऱ्या रिसॉर्टमध्ये काही दिवस राहणार आहेत. त्यावरून जेडीयूचे नेते राजीव रंजन सिंह यांनी कॉंग्रेसला लक्ष्य केले. कॉंग्रेसचा स्वत:च्या आमदारांवरच विश्वास नाही. तो पक्ष देशातील जनतेचा विश्वास कसा जिंकणार, असा सवाल त्यांनी संसद भवनाबाहेर पत्रकारांशी बोलताना विचारला. त्यावर कॉंग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली.
बिहारमधील शक्तिपरीक्षेमुळे आमदारांची फोडाफोडी होण्याची धास्ती महाआघाडीला वाटत आहे. त्यामुळे कॉंग्रेसच्या १९ पैकी बहुतांश आमदारांना रविवारी हैदराबादला हलवण्यात आले. नितीश यांनी पुन्हा राजकीय कोलांटउडी मारल्याने काही दिवसांपूर्वी बिहारच्या सत्तेत असणारी महाआघाडी आता विधानसभेत विरोधी बाकांवर बसणार आहे.