कठुआ (जम्मू आणि काश्मीर – कॉंग्रेसने आता भारत जोडो यात्रेच्या यशानंतर हाथसे हाथ जोडो ही मोहीम हाती घ्यायचे ठरवले असून ही मोहीम दोन महिने चालणार आहे, असे कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयराम रमेश यांनी शुक्रवारी सांगितले. 26 जानेवारी पासून ही मोहीम सुरू होत आहे.
जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करताना रमेश म्हणाले की, 6 लाख गावे आणि 2.5 लाख ग्रामपंचायतींमधील 10 लाख मतदान केंद्रांमध्ये ही मोहीम राबवण्यात येणार असून त्याद्वारे कॉंग्रेसचा प्रचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल. या मोहीमेत कॉंग्रेस कार्यकर्ते घरोघरी जाऊन राहुल गांधींचे पत्र लोकांपर्यंत पोहोचवतील. याच दरम्यान भाजप सरकारच्या अपयशाची यादी लोकांपर्यंत पोहचवली जाईल आणि भाजपविरोधात जनतेचे आरोपपत्रही ठेवले जाणार आहे.
कॉंग्रेसचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता या मोहीमेत सहभागी होईल त्यात सहभागी न होणे ही गंभीर बाब समजली जाईल असेही कॉंग्रेस पक्षातर्फे सांगण्यात आले आहे. हाथ से हाथ जोडो अभियान ही राहुल गांधी आणि कॉंग्रेसची सर्वात मोठी मोहीम आहे, भारत जोडो यात्रेत सर्वसामान्यांना जो संदेश देण्यात आला होता तो आता हात से हाथ जोडो अभियानांतर्गत प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा कॉंग्रेसचा उद्देश आहे.