अहमदाबाद – राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेत नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या सहभागावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी पुन्हा कॉंग्रेसवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेसने गुजरातमधील जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि फोडा आणि झोडा ही नीती टाळली पाहिजे असे आव्हान त्यांनी केले आहे.
भावनगर जिल्ह्यातील पालिताना शहरात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.मोदी म्हणाले की, गुजरातमधील जनतेने कॉंग्रेसला नाकारले आहे. कारण एका समुदायाला किंवा प्रदेशाला दुसऱ्याच्या विरोधात भडकावण्याचे काम त्यांनी नेहमीच केले आहे. त्यामुळे भारत तोडू इच्छिणाऱ्या घटकांना पाठिंबा देणाऱ्यांना गुजरातचे लोक मदत करणार नाहीत असे त्यांनी नमूद केले.
भारत जोडो यात्रेत मेधा पाटकर यांना सहभागी करून घेतल्याबद्दल मोदींनी या आधीही राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला होता. आजच्या सभेत मोदींनी कॉंग्रेसवर आरोप केला की, नर्मदेचे पाणी सौराष्ट्रातील दुष्काळी प्रदेशापर्यंत पोहोचवण्यामध्ये कॉंग्रेसकडून अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. सरदार सरोवर धरण प्रकल्प 40 वर्षे रखडवणाऱ्या लोकांना गुजरातची जनता कधीही माफ करणार नाही, असे ते म्हणाले.
कॉंग्रेसची विचारधारा ही फूट पाडा आणि राज्य करा अशा पद्धतीची आहे. स्वतंत्र गुजरात राज्य स्थापन होण्याआधी कॉंग्रेसने गुजराथी आणि मराठी भाषिकांना एकमेकांच्या विरोधात लढवले. नंतर, कॉंग्रेसने विविध जातींच्या लोकांना भडकावले. कॉंग्रेसच्या अशा पापांमुळे गुजरातला खूप त्रास सहन करावा लागला. गुजरातच्या हुशार लोकांना कॉंग्रेसची ही रणनीती समजली आणि त्यांनी एकजुटीने त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला असे ते म्हणाले. गुजरात गेल्या 20 वर्षांपासून विकासाच्या मार्गावर आहे असा दावाही त्यांनी केला.