नवी दिल्ली – देशात लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदा तयार करण्याची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केली आहे. तसे झाले नाही, तर देशात ना सामाजिक समरसता राहणार ना, एकता टिकणार असा दावा करतानाच या सगळ्याचा परिणाम म्हणजे देशाचा विकासही होणार नाही असे त्यांनी नमूद केले आहे.
ते पुढे म्हणाले की, 1978 मध्ये चीनचा दरडोई उत्पन्न आपल्यापेक्षा कमी होते. आज ते आपल्या पुढे निघून गेले आहेत. त्याचे कारण त्यांनी 1979 मध्ये एक मूल हे धोरण ठरवले आणि त्याची अमलबजावणी केली. आपल्याकडे मर्यादीत साधन संपत्ती असल्यामुळे लोकसंख्या नियंत्रण विधेयक अत्यंत महत्वाचे आहे. चीनने ते धोरण राबवल्यामुळेच त्यांचा विकास झाला. त्या देशात एका मिनिटाला 10 मुले जन्माला येतात. मात्र भारतात एका मिनिटाला 30 मुले जन्माला येतात याकडे त्यांनी लक्ष वेधले व असेच सुरू राहीले तर आपण चीनचा मुकाबला कसा करणार असा सवाल उपस्थित केला.
लोकसंख्या नियंत्रण विधेयक देशातील सगळे धर्म आणि जातींना लागू केले पाहिजे. जो त्याचे पालन करणार नाही त्यांना कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ दिला जाउ नये. सोबतच त्यांचा मतदानाचा हक्कही काढून घेतला पाहिजे.
दरम्यान, महिलांच्या विरोधातील गुन्ह्यांबाबतही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले की महिला विरोधी गुन्ह्यांकडे धर्माच्या चष्म्यातून न पाहता त्याचा सगळ्यांनी निषेधच केला पाहिजे. महिला कायमच त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात गप्प राहतात. त्या अन्याय सहन करतात मात्र बोलत काहीच नाही. लोक काय म्हणतील ही भिती त्यांना सतावत असते. लिंगसंबंधी अत्याचार समाप्त करण्याबाबत आमचे सरकार कटीबध्द असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.