कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी “भारत जोडो’ यात्रा सुरू केली आहे. यामागील राजकीय हेतू तर आहेच; पण यातून कॉंग्रेस पक्षाला उभारी मिळावी आणि भारत जोडताना पक्षही जोडावा, असा विचार समोर येत आहे.
महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसने 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टॅंक मैदानावर “भारत छोडो’ आंदोलनाची घोषणा केली आणि 9 ऑगस्टला “क्रांती दिन’ पाळायचं ठरलं. आज या घटनेला 80 वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाल्यानंतर कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी देशव्यापी भारत जोडो यात्रेची घोषणा केली. ही यात्रा 7 सप्टेंबरला सुरू झाली असून आणि दक्षिणेत कन्याकुमारीपासून उत्तरेकडे काश्मीरपर्यंत पाच महिन्यांत एकूण 3 हजार 570 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेत एकूण 12 राज्यांचा आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असणार आहे. राहुल गांधींच्या दोन दशकांच्या राजकीय कारकिर्दीतील ही सर्वात मोठी यात्रा असणार आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या 75 पैकी 55 वर्षे कॉंग्रेसचे राज्य असताना आणि त्यापैकी 38 वर्षे नेहरू-गांधी परिवारातील व्यक्ती पंतप्रधान पदावर असताना आज “भारत जोडो’ची गरज का भासावी हा खरा प्रश्न आहे.
55 वर्षांपैकी 38 वर्षे नेहरू-गांधी घराण्याची सत्ता राहिली इतकेच नव्हे तर दहा वर्षे डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना सोनिया गांधी पक्षाच्या आणि संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा होत्या. एकप्रकारे 55 पैकी 48 वर्षे नेहरू-गांधी घराण्याकडे सत्ता किंवा सत्तेची सूत्रे राहिली. मात्र, 2014 पासून गेली आठ वर्षे भाजप सत्तेत आल्यापासून कॉंग्रेस इतकी रसातळाला पोचली आहे की, लागोपाठ दोन वेळा पक्षाचा केवळ पराभव झाला असे नव्हे तर विरोधी पक्षनेता बनण्यासाठी आवश्यक 54 जागासुद्धा कॉंग्रेसला लोकसभेत मिळविता आल्या नाहीत.
जर भाजपची ही घोडदौड अशीच सुरू राहिली तर लागोपाठ तिसरी टर्म मिळू शकते. ही घोडदौड थांबवायलाच राहुल गांधींनी “भारत जोडो’ यात्रेची सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीला दीड-दोन वर्षाचा अवधी असताना भारत जोडो यात्रेद्वारे कॉंग्रेसमध्ये जोश आणण्याचा हा प्रयत्न निश्चितच योग्य आहे. या यात्रेद्वारे राहुल गांधींनी दोन गोष्टी सिद्ध केल्या आहेत. एक भाजपला पर्याय म्हणून केवळ कॉंग्रेस आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देऊ शकेल असे एकमेव नेते केवळ राहुल गांधी आहेत. तिसरी शक्ती किंवा नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून समोर येणाऱ्या इतर क्षेत्रीय नेत्यांची नावे किती निरर्थक आहेत हेही यातून सिद्ध होते. त्याचबरोबर कॉंग्रेसमधील तथाकथित असंतुष्ट नेत्यांनासुद्धा एक जाणीव करून दिली आहे की नेहरू-गांधी परिवाराच्या नेतृत्वाशिवाय कॉंग्रेस पुढे जाऊ शकत नाही.
याआधी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात एखादे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून भारत भ्रमण करणाऱ्या नेत्यांमध्ये महात्मा गांधी, विनोबा भावे, माजी पंतप्रधान चंद्रशेखर, समाजसेवक बाबा आमटे यांचं समावेश आहे. आज राहुल गांधींचं नाव त्याच पंक्तीत घेतलं जाईल. महाराष्ट्रात या यात्रेची जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्याकडे देण्यात येणे ही एक प्रकारे सध्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना ताकीद देण्याचा प्रकार आहे असं वाटतं. आपल्या बडबडीमुळे नाना अनेकवेळा वादात सापडले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे या यात्रेची जबाबदारी न देण्याचं कारण तेच असावं असं वाटतं.
कॉंग्रेसद्वारे असं सांगण्यात येत आहे की, या यात्रेतून दहशतीच्या राजकारणाला आणि सर्वसामान्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या, बेरोजगारी, विषमता वाढवणाऱ्या अर्थव्यवस्थेला पर्याय मिळेल. प्रश्न हा आहे की, याच वर्षीच्या डिसेंबर महिन्यात गुजरातच्या निवडणुका
होऊ घातल्या आहेत. या यात्रेचा फायदा कॉंग्रेसला गुजरात, हिमाचल प्रदेशच्या निवडणुकात कितपत होतो ते दिसेलच; पण राहुल गांधींना आपला करिश्मा दाखवण्याची ही एक संधी आहे. यात ते थोड्या फार प्रमाणात जरी यशस्वी झाले तरी त्याचे परिणाम या आणि पुढे होणाऱ्या राज्य निवडणुकांत दिसून येईलच. तसेच त्यावरच कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील भाजपविरोधी आघाडीचं भविष्य अवलंबून असेल. राहुल गांधींच्या नेतृत्वाला हिणवणारं भाजप या यात्रेकडे सावधपणे पाहत आहे. कारण नेहरू-गांधी परिवाराच्या भारतातील प्रभावाची त्यांना कल्पना आहे.
त्याचबरोबर, भारतातील विविध डाव्या आणि समाजवादी संघटनांशी जवळीक असणाऱ्या अनेक नेत्यांनी या यात्रेला पाठिंबा दिला आहे, त्याला फार महत्त्व आहे. एक प्रकारे भाजपविरोधी सर्व विचारवंत राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली यायला तयार झाले आहेत ही 2024 च्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून एक लक्षणीय घटना आहे. सुमारे 150 संघटनांच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या यात्रेला पाठिंबा दर्शविला आहे.
ही भारत जोडो यात्रा भाजपविरोधी पक्ष जोडो आहे, असं वाटतं. त्यासाठी केडर असलेल्या डाव्या संघटनांनासुद्धा या यात्रेत सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. कम्युनिस्ट आणि संघ परिवाराची वैचारिक निष्ठा जबरदस्त असते. त्यामुळे हे कार्यकर्ते स्वतःला झोकून देऊन काम करत असतात.
राहुल गांधी एकदा म्हणाले होते की, सामाजिक विषयावर आमचे आणि डाव्यांचे एकमत आहे. मात्र, आर्थिक बाबींवर आमचे मतभेद आहेत. मात्र आज भाजपविरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी डाव्या पक्षांना एकत्र आणणं अत्यंत आवश्यक आहे. स्वत: राहुल गांधींनी त्या दिशेने पावलं उचलली आहेत, ही चांगली गोष्ट आहे. देशभर पसरलेल्या पण संख्येने तुटपुंज्या असलेल्या डाव्या आणि समाजवादी कार्यकर्त्यांच्या मदतीने तसेच शिवसेना, जनता दल (युनायटेड) यासारख्या क्षेत्रीय पक्षांच्या भरवशावरच कॉंग्रेस देशात 2024 मध्ये सत्तांतरासाठी प्रयत्न करू शकतो. सध्या त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेबाबत ट्विट करताना म्हटलं, तुमचं एक पाऊल आणि एक माझं पाऊल एकत्र आले तर आपला देश जोडला जाईल. या चालीने राहुल गांधी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काय चमत्कार दाखवतात ते दिसेलच.