नवी दिल्ली: लडाक सीमेजवळ चीनशी झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराचे 20 जवान शहिद झाले. या विषयावरून कॉंग्रेसने केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला घेरण्याचा प्रयत्न चालवला आहे. पक्षाने सरकारच्या विरोधात आघाडी उघडली आहे. पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी व त्यांचे पुत्र राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून रोजच मोदी सरकारला लक्ष्य करत असताना अन्य विरोधी पक्ष अथवा त्यांच्या सहकारी पक्षांचीही त्यांना साथ मिळत नसल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि बहुजन समाज पक्षाच्या मायावती सरकारसोबत उभे असल्याचे प्रतित होत आहे. त्यामुळे या मुदद्यावर कॉंग्रेस पक्ष एकाकी पडला असल्याचे सध्यातरी दिसून येते आहे.
चीनविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. तेव्हा आपल्या भूमीत कोणीही प्रवेश केलेला नाही. भारताच्या कोणत्याही पोस्टवर कोणाचाही कब्जा नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले होते. तेव्हा मोदी यांना याच विधानावरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न कॉंग्रेसने केला. जर पंतप्रधान म्हणतात ते खरे असेल तर आपले 20 जवान शहिद कसे झाले, असा प्रश्न कॉंग्रेसने उपस्थित केला आहे.
त्यानंतर सोनिया आणि राहुल यांनी सरकारवरील टीकेचे नेतृत्व तर केलेच, पण कॉंग्रेसकडलन शहिद मानवंदना दिवसही पाळण्यात आला. सरकार आपली जबाबदारी टाळू शकत नाही.
तसेच पंतप्रधानांनी देशाला विश्वासात घ्यावे अशी मागणी सोनिया यांनी केली तर पंतप्रधानांनी सत्य बोलावे. त्यांनी चीनकडून आपली जमीन परत मिळवण्यासाठी कारवाई करावी. सारा देश त्यांच्यासोबत उभा राहील असे राहुल यांनी म्हटले आहे. त्यानंतर कॉंग्रेसच्या गोटातून रोजच सरकारच्या विरोधात आक्रमक वक्तव्ये केली जात आहेत.
दरम्यान, सोमवारी याबाबत बोलताना मायावती म्हणाल्या की, या विषयावर राजकारण करण्याचा प्रयत्न अयोग्य आहे. त्याचा झाला तर चीनलाच लाभ होईल आणि देशाच्या जनतेला परिणाम भोगावे लागतील. केंद्रात सरकार कोणाचेही असले तरी देशाच्या हिताच्या मुद्द्यावर आम्ही सरकारसोबत आहोत.
सर्वपक्षीय बैठकीच्या अगोदरही त्यांनी हीच भूमिका घेतली होती. चीनबाबत काय करायचे, ते सरकारवर सोडून द्यायला हवे. सरकारवरच जबाबदारी असून त्यांनी देशहिताचा निर्णय घ्यावा आणि विरोधी पक्षांनीही परिपक्वता दाखवावी, असे त्या म्हणाल्या होत्या. शरद पवार यांनीही कॉंग्रेसपेक्षा वेगळी भूमिका मांडली होती. 1962 नंतर काय झाले होते, ते आपण विसरू शकत नाही. चीनने भारताचा 45 हजार स्क्वेअर किमी भूभाग बळकावला होता, याचे स्मरण त्यांनी करून दिले. ती जमीन अजुनही त्यांच्याकडेच आहे. आता परवाच्या घडामोडीत चीनने जमीन बळकावली की नाही, याची आपल्याला माहिती नाही.
मात्र आपण हा इतिहास विसरता कामा नये. तसेच राष्ट्रीय
सुरक्षेच्या मुदद्यावर राजकारण केले जाउ नये, असेही त्यांनी म्हटले होते. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही ट्वीट करून आपण सरकारसोबतच असल्याचे संकेत दिले आहेत. भारताने केवळ सामरिकच नव्हे, तर चीनला आर्थिक प्रत्युत्तरही द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
प्रत्येकच विषयावर सरकारपेक्षा विसंगत भूमिका घेणाऱ्या तृणमुल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीही सरकारला पाठिंबा दर्शवला आहे. चीन हा ठोकशाही असलेला देश आहे. आपल्याला सगळ्यांना एकत्र काम करावे लागेल. तर भारताचा विजय आणि चीनचा पराभव होईल, असे त्यांनी नमूद केले आहे. जगनमोहन रेड्डी. चंद्रशेखर राव अशा बहुतेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पक्षप्रमुखांनी सरकारला समर्थन देणारी वक्तव्ये केली असल्यामुळे कॉंग्रेसला या विषयावर एकाकीपणाचा सामना करावा लागू शकतो.