Nana Patole – देशात आज लोकशाही व संविधान संपवण्याचे काम केले जात आहे. महागाई, बेरोजगारी, शेतकरी, कामगार यांचे प्रश्न गंभीर झाले आहेत. मोदी सरकारने निर्माण केलेल्या या अत्याचारी व्यवस्थेला संपवण्यासाठी भ्रष्टाचारमुक्त भारत, अत्याचारमुक्त भारत निर्माण करण्याबरोबरच रोजगार निर्मिती करणे,
महागाई कमी करणे, शेतकरी-कामगार यांना न्याय देणे, लोकशाही व संविधान वाचवणे हे काँग्रेस पक्षाचे दायित्व आहे. त्यासाठीच ‘है तैयार हम’ अशी संकल्पना मांडलेली आहे. नागपूरमध्ये होत असलेल्या या मेळाव्यासाठी राज्यभरातून लाखो लोक उपस्थित राहणार आहेत.
लोकांना वाटते त्यांचे मत दुसऱ्या पक्षाला जाते त्याचा गांभिर्याने विचार झाला पाहिजे. मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावे ही जर लोकांची मागणी असेल तर त्याची दखल केंद्र सरकारने व निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ईव्हीएमसंदर्भात व्यक्त केले आहे.
काँग्रेस पक्षाचा स्थापन दिवस 28 डिसेंबर यावर्षी नागपूरच्या ऐतिहासिक भूमित महारॅलीने साजरा केला जात आहे. या निमित्ताने काँग्रेसचा 138 वा वर्धापन दिन नागपूरमध्ये होत आहे. ही नागपूर व महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे. है तैयार हम महारॅलीमुळे महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व आनंद आहे, असे नाना पटोलेंनी (Nana Patole) म्हणाले.
ईव्हीएम संदर्भात पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, ईव्हीएमवर लोकांमध्ये संशय आहे, त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. लोकांना वाटते त्यांचे मत दुसऱ्या पक्षाला जाते त्याचा गांभिर्याने विचार झाला पाहिजे. मतदान पत्रिकेवर मतदान घ्यावे ही जर लोकांची मागणी असेल तर त्याची दखल केंद्र सरकारने व निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना हेच नरेंद्र मोदी ईव्हीएमला विरोध करत होते.
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, सतिश चतुर्वेदी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, विधान परिषद सदस्य अभिजीत वंजारी, आमदार वजाहत मिर्झा, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, आदी उपस्थित होते.
नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, स्वातंत्र्य चळवळीत डिसेंबर 1920 मध्ये नागपूरच्या भूमितूनच महात्मा गांधी यांनी जुलमी, अत्याचारी ब्रिटिश सत्तेविरोधात असहकार आंदोलनाचा नारा दिला होता. शेवटी 1947 मध्ये ब्रिटिशांना भारत देश सोडून पळून जावे लागले हा इतिहास आहे.
नागपूर हे देशातील मध्यवर्ती ठिकाण आहे. नागपूरमधूनच 1959 मध्ये इंदिरा गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली गेली होती. अशा ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या नागपूर शहरात काँग्रेसचा 138 वा स्थापना दिवस साजरा होत आहे ही काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी महत्वाची व आनंदाची बाब आहे.