पुणे,{प्रभात वृत्तसेवा}- दत्तनगर ते पीआयसीटी मुख्य रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम मागील दोन ते तीन आठवड्यांपासून सुरू आहे. कामाचा वेग अतिशय संथ असल्याने पर्यायी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी सोडवण्यााठी महापालिका तसेच वाहतूक पोलीस कोणतेच प्रयत्न करीत नाहीत.
यामुळे सकाळ -संध्याकाळ वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी थेट पोलीस नियंत्रण कक्षाकडे एक नव्हे तर तीन वेळा दाद मागितली. मात्र, त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
महापालिका प्रशासनाकडून धनकवडी, कात्रज दूध डेअरी, भारती विद्यापीठ परिसरात एकाच वेळी पाइपलाइन आणि सिमेंटच्या रस्त्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांना घराकडे जाण्यासाठी गल्लीबोळांतून मार्ग काढावा लागत आहे. अरुंद गल्लीबोळांमध्ये दोन्ही बाजुने चारचाकी, दुचाकी वाहने समोरासमोर आल्यास तासन्तास वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी वॉर्डन किंवा वाहतूक पोलिसही नसल्याने दिवसभर छोटे रस्तेही कोंडीत अडकत आहेत.
या कामांच्या ठिकाणी संबंधित कॉन्ट्रॅक्टरने कामाचे स्वरूप व त्याचे टेंडर नंबर त्याची पूर्ण वेळ होण्याचा कालावधी याबद्दल माहितीचा फलक लावणे अपेक्षित असताना केवळ रस्ता बंदचे फलक लावण्यात आले आहेत. मात्र, पर्यायी रस्त्याचे फलक लावलेले नाहीत. त्यामुळे वाहन चालक मिळेल त्या गल्लीबोळातून सोसायट्यांतून रस्ता शोधत मुख्य रस्त्यावर येण्याचा प्रयत्न करतात यामुळे सध्या या परिसरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्तेही कोंडीत हरवले आहेत.
या कामाची काही सजग नागरिकांनी चौकशी केली असता सदर कामाला सहा महिन्यात पर्यंतचा कालावधी लागू शकतो असं लक्षात आले. तर कामाचा दर्जाबद्दल नागरिक सांगतात की केलेल्या कामावर पाणी मारणे आवश्यक आहे ते पण मारले जात नाही. यामुळे कामाचा दर्जा जर चांगला नसेल तर वरचा स्तर उखडून वाळू कच वर येऊन भविष्यात समस्या वाढू शकतात.
तसेच तिरंगा चौक ते राजमाता भुयारी मार्गाकडे जाताना जो भाग आहे तेथे तांत्रिकदृष्ट्या बऱ्याच अडचणी आहेत . ड्रेनेजच्या व रेन वॉटर संदर्भातही समस्या आहेत. तेथे तर डांबरी रस्ता न खोदता त्यावर सिमेंटचे थर टाकून रस्ता तयार केला जात आहे. यामुळे रस्त्याची उंची अर्धा फूट उंची वाढली आहे. रस्त्याकडेची सर्व दुकाने फुटभर रस्त्याच्या खाली गेल्याने पावसाचे पाणी शिरण्याचा धोका आहे.
यासंदर्भात महापालिका आयुक्तांनाही परिसरातील सर्व नागरिकांच्यावतीने मधुकर वाळुंजकर, शंतनू पेंढारकर, अनिल पोवार, किसनराव ओव्हाळ ,एन टी वाघ, अशोक भुजबळ, विश्वास सूर्यवंशी, दिगंबर यादव, मीलिंद फाटक, धवल थिटे, हृषिकेश ओव्हाळ, केतन मोहिते यांनी निवेदन दिले आहे.
आम्ही पोलीस नियंत्रण कक्षाला दोन ते तीन वेळा कॉल करुन समस्येची माहिती दिली. मात्र कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांकडून फक्त फिडबॅकसाठीच कॉल आले – मधुकर वाळुंजकर (रहिवाशी)