मातंग समाजाच्या धर्मशाळा आवारात टाकताहेत राडारोडा
आळंदी – आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेक-कांबळे यांचे पती अशोक कांबळे एका मातंग समाजाच्या धर्मशाळेच्या आवारामध्ये आणि धर्मशाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर राडारोडा टाकत असल्याची तक्रार विश्वस्तांनी नागरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांच्याकडे केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील इंद्रायणी नदीच्या काठावर जुन्या पुलाजवळ पुणे जिल्हा मातंग समाजाची धर्मशाळा आहे. संत गाडगेबाबांच्या पुढाकारातून ही धर्मशाळा उभारण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या वारीला आलेले भाविक, वारकरी नियमित येऊन या ठिकाणी भजन, कीर्तन करत असतात; परंतु गेले वर्षभर करोनाच्या प्रादुर्भावामुळे या ठिकाणचा राबता कमी झाला आहे. तसेच या धर्मशाळेला उर्जितावस्था देणारे आणि धर्मशाळेचा नित्य कारभार पाहणारे निवृत्तीबुवा गायकवाड यांचेही काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे.
या गोष्टींचा गैरफायदा घेऊन विश्वस्त मंडळाची परवानगी न घेता नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर-कांबळे यांचे पती अशोक कांबळे यांनी हा राडारोडा धर्मशाळेच्या आवारात तसेच रस्त्यावर टाकण्यास सुरुवात केली आहे. वारंवार केलेली विनंतीही त्यांनी झिडकारून लावली आहे. त्यामुळे धर्मशाळेत येणाऱ्या भाविकांची तर गैरसोय होणारच आहे, परंतु नदीच्या वाहत्या पात्रासही अडथळा होणार आहे, असे विश्वस्त नानाभाऊ लोंढे यांनी सांगितले. याबाबत मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनाही पत्र देण्यात आले आहे. यामध्ये लक्ष घालण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडूनही चौकशी सुरू
आळंदी नगरपरिषदेच्या दैनंदिन कामात नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर-कांबळे यांचे पती अशोक कांबळे वारंवार अवैधरित्या हस्तक्षेप करतात, या कारणावरून जिल्हाधिकाऱ्यांच्याकडूनही चौकशी सुरू आहे.
या जागेची प्रत्यक्ष पाहणी करून जी काही परिस्थिती असेल त्यानुसार कारवाई करण्यात येईल.
– अंकुश जाधव, मुख्याधिकारी, नगरपालिका, आळंदी