सातारा,(प्रतिनिधी) – आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नांमुळेच उरमोडी, तारळी आणि जिहे-कठापूर योजनांचे पाणी खटाव तालुक्यात आल्याचे विरोधकही मान्य करतात. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मतदारसंघात हजारो साखळी सिमेंट बंधारे उभे राहिल्याने, पाणी अडवले जात आहे.
विरोधकांनी पाणीप्रश्नासाठी काय केले, हे एका व्यासपीठावर येऊन सांगायचे आव्हान स्वीकारले नाही. मराठा आरक्षणासाठी आ. गोरे यांनी विधानसभेत अनेक वेळा आवाज उठवला आहे. दम असेल तर त्यांचे आव्हान स्वीकारा, असे वडूजचे नगरसेवक जयवंत पाटील यांनी सांगितले.
वडूज येथे बोलताना जयवंत पाटील म्हणाले, माण-खटावचा दुष्काळ हटवण्याच्या ध्येयाने आ. गोरे यांनी सुरुवातीपासून वाटचाल केली आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांमुळेच, पाणी योजनांसाठी वरिष्ठांकडून वेळोवेळी भरघोस निधी आणला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे फक्त पाणी योजनांसाठी निधी त्यांनी मागितला. त्यांची जनतेबद्दलची तळमळ पाहूनच वरिष्ठांनी खटाव-माणच्या पाणी योजनांना निधी दिला.
जिहे-कठापूरची वाढीव योजना कमी कालावधीत मंजूर करून, काम अंतिम टप्प्यात आणण्याची किमयाही जयाभाऊंनीच केली आहे. पाण्याचे फेरवाटप, कलेढोण, मायणी, कुकुडवाडसह 42 गावांना टेंभू योजनेचे पाणी देणार्या योजनेचे टेंडरही त्यांच्याच प्रयत्नांमुळे निघाले आहे. औंधसह 22 गावांचा पाणीप्रश्न त्यांनी अंतिम टप्प्यात आणला आहे.
उरमोडीचे पाणी गेली दहा वर्षे तालुक्यात येत आहे. पाणी योजनांच्या लाभक्षेत्रात मतदारसंघातील उरलेल्या गावांचा समावेश त्यांनी करून घेतला आहे. दुष्काळ हटविण्यासाठी गेल्या 14 वर्षात त्यांनी इतके परिश्रम केले आहे. सत्ता असताना ज्यांना निधी आणता आला नाही, ते सत्ता नसताना अस्तित्वाची लढाई लढत आहेत.
आ. गोरेंनी पाणी आणल्याने भागात बागायती शेती आणि कारखानदारी वाढली आहे. तालुक्यात होत असलेला बदल जनतेला दिसत असला, तरी आंदोलक आणि त्यांच्या आश्रयदात्यांच्या डोळ्यांवर झापड आली आहे. यावेळी नगरसेवक अमोल गोडसे, आप्पा गोडसे, गणेश गोडसे, काका बनसोडे, नीलेश करपे उपस्थित होते.
नाटकी आंदोलनाची उडवली होती खिल्ली
मराठा समाजासाठी विधानसभेत वेळोवेळी आवाज उठवणार्या आ. गोरे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या विरोधात एकही शब्द काढला नव्हता. पाणीप्रश्नावरील नाटकी आंदोलनाची त्यांनी खिल्ली उडवली होती. मात्र, सर्व बाबतीत अकार्यक्षम असणारे विरोधक सपशेल खोटे बोलत आहेत. स्वार्थासाठी वेगवेगळ्या पालकमंत्र्यांच्या गाड्यांमध्ये बसणार्यांनी पाणीप्रश्नावर बोलूच नये, असा इशारा पाटील यांनी दिला.