कोपरगाव – अनेक शेतकरी तांत्रिक अडचणीमुळे अजूनही पीक विमा अर्ज भरू शकले नाहीत व पीक विमा अर्ज सादर करण्याची मुदत दि. 31 जुलैपर्यंत असल्यामुळे असंख्य शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार होते. त्यामुळे पीक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. त्या मागणीची दखल घेवून पीक विम्यासाठी अर्ज करण्याची मुदत 3 ऑगस्टपर्यंत वाढविली असल्याची माहिती आ. काळे यांनी दिली.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले असून राज्य शासनाने यावर्षीपासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याच्या घेतलेल्या निर्णयानुसार शेतकरी विमा हप्ता रक्कम राज्य शासन भरणार असून शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा पोर्टलवर नोंदणी करून पीक विम्यासाठी अर्ज करणे गरजेचे आहे.
पीक विमा अर्ज भरण्यासाठी अंतिम मुदत 31 जुलै पर्यंतच देण्यात आली होती. परंतु पीक विमा अर्ज भरण्यासाठी सर्व्हर डाऊन होत असल्यामुळे मतदार संघातील 60 हजाराच्यावर शेतकरी पीक विमा अर्ज भरू शकले नव्हते. जर पीक विमा अर्ज मुदतीत भरला गेला नाही तर हजारो शेतकरी पीक विम्याला मुकणार होते. त्यामुळे पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणी आ. काळे यांनी मागील आठवड्यात कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्राद्वारे मांडल्या होत्या. त्या पत्राची दखल घेवून कृषीमंत्र्यांनी पी विमा अर्ज भरण्यासाठी 3 ऑगस्टपर्यंत मुदत वाढ दिली आहे.